पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी

पुणे: जिल्ह्यातील चाकण आणि हिंजवडी या अत्यंत महत्त्वाच्या औद्योगिक व व्यावसायिक पट्ट्यांमध्ये पायाभूत सुविधांचा मोठा अभाव असून, रस्ते, फुटपाथ आणि वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिक व उद्योग क्षेत्र त्रस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण आणि हिंजवडीच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

चाकण MIDC आणि परिसराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व बैठकीत आदित्य ठाकरे यांनी प्रशासकीय कारभारावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, या औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून चालण्यासाठी योग्य फुटपाथ नाहीत, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर अवजड व साधारण वाहनांची वर्दळ असल्यामुळे भीषण वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. पालकमंत्र्यांनी दरमहा नियमितपणे आढावा बैठक घेऊन या सर्व बाबींचा सखोल पाठपुरावा केला पाहिजे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांना एकत्र बोलावून फुटपाथची वानवा, कचरा व्यवस्थापन आणि रोजच्या वाहतूक कोंडीबाबत जाब विचारला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना त्यांनी प्रशासकीय दिरंगाईवर शेरे ओढत तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कर्तृत्ववान व शिस्तप्रिय अधिकाऱ्याची आठवण काढली. अनेक वेगवेगळे विभाग आणि अधिकारी असूनही जर समस्या सुटत नसतील, तर “अनेक लोकांपेक्षा एक चांगला आणि खमका अधिकारी द्या, जो सर्व परिस्थिती सुधारू शकेल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चाकण आणि हिंजवडी या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पट्ट्यांमधून उद्योग बाहेर जाण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर दावा करत, जर विद्यमान उद्योगांना योग्य सुविधा दिल्या नाहीत तर त्याचा थेट परिणाम स्थानिक युवकांच्या रोजगारावर होईल, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *