तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!

कल्याण: अस्वच्छ आणि घाणेरड्या कारखान्यात बनत होती पाणीपुरी; केडीएमसीची धडक कारवाई रस्त्यावर मिळणारी चविष्ट पाणीपुरी आणि शेवपुरी खाणे अनेकांना आवडते, पण हीच पाणीपुरी आपल्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते, याचा प्रत्यय कल्याणमधील एका घटनेने दिला आहे. कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात अत्यंत अस्वच्छ वातावरणात पाणीपुरी आणि शेवपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्यांचे उत्पादन करणाऱ्या एका बेकायदा कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) या कारखान्यावर मोठी कारवाई करत तो तात्काळ सील केला आहे.

काय आहे प्रकरण? कल्याण पूर्वेतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मागील बाजूस हा कारखाना सुरू होता. येथे मोठ्या प्रमाणावर पाणीपुरी आणि शेवपुरीच्या पुऱ्या बनवल्या जात होत्या. स्थानिक नागरिकांकडून या कारखान्याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ गंभीरपणे घेत, केडीएमसीचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने अचानक छापा टाकला.

अधिकारीही हादरले: कारखान्यातील दृश्य पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. पुऱ्या तळण्यासाठी वापरले जाणारे तेल अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि काळे पडलेले होते. कारखान्यात कमालीची अस्वच्छता असून, स्वच्छतेच्या मूलभूत नियमांचेही उल्लंघन केले जात होते. कामगारांकडून कोणतीही सुरक्षितता किंवा स्वच्छता पाळली जात नव्हती, ज्यामुळे हे पदार्थ खाणाऱ्या नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला असता. हा कारखाना संजय सोकर आणि रमेश सरोज यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे.

पुढील कारवाईचा इशारा: या कारवाईनंतर केडीएमसीचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी स्पष्ट केले आहे की, संबंधित कारखाना ज्या इमारतीत सुरू होता, ती इमारत अनधिकृत असल्याचे आढळल्यास त्यावरही कठोर कारवाई केली जाईल. तसेच, शहरात अशा प्रकारे सुरू असलेल्या कोणत्याही अस्वच्छ आणि बेकायदेशीर अन्न उत्पादन केंद्रांवर भविष्यातही अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.



शहर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *