एन. रघुरामन यांचा कॉलम:एआयकडून यांत्रिक कामे करून घ्या, त्याला विचार करायला लावू नका

हे एक विचित्र आंदोलन होते. पोलंडमधील वॉर्सा येथे ‘डिजिटल अफेअर्स’ मंत्रालयाच्या कार्यालयासमोर सोमवारी 30 आंदोलक जमले होते. त्यांनी केवळ पोलंडलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला थक्क करून सोडले. या आंदोलकांनी पोलंडचे डिजिटल कार्यमंत्री क्रिस्तोफ गोव्हकोवस्की यांना कार्यालयाबाहेर येऊन बोलण्यास भाग पाडले. ते एआयवर नियंत्रणाची मागणी करत होते. लक्षात ठेवा. आंदोलकांची संख्या फक्त 30 होती. ही लहान संख्या अचंबित का करते? कारण ती माणसे नव्हती, तर रोबोट होते! गोव्हकोवस्की यांनीही त्यांच्या मागणीशी सहमती दर्शवली. ते म्हणाले, “ह्युमनॉइड्समध्ये वापरलेले असे अनियंत्रित एआय मॉडेल्स, ते रोबोटायझेशनसोबत सतत विकसित होत राहतील ही एक मोठी समस्या आहे.’ या घटनेमुळे मला गेल्या महिन्यात एका ज्युनियर वकिलासोबत झालेली भेट आठवली. तो खूप निवांत दिसत होता. हातात कोणतीही कागदपत्रे न घेता तो ऑडिटोरियममध्ये संगीताचा आनंद घेत होता. मी त्याला म्हणालो, “तुम्ही तर ‘सूट्स’ या गाजलेल्या लीगल ड्रामा सिरीजमधील स्टायलिश वकील हार्वीसारखे दिसत आहात.’ तो हसला आणि म्हणाला, “एआयचे आभार. त्याने माझ्यासारख्या वकिलांचे रूपच बदलून टाकले आहे. आता आम्हाला कागदपत्रांचे ढीग सोबत घेऊन फिरण्याची किंवा रात्रभर घरात बसून ती चाळण्याची गरज पडत नाही.’ त्यानंतर आमच्यात एआय टूल्स काम कसे सोपे करत आहेत यावर चर्चा सुरू झाली. एआय नोकऱ्या हिरावून घेण्याऐवजी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवत आहे यावर आम्हा दोघांचेही एकमत होते. पुढे काय करायचे हे ठरवण्यासाठी करारातील 100 कलमे वाचत बसण्यापेक्षा एआय काही सेकंदात ती स्कॅन करून उत्तर देऊ शकतो. यामुळे वकिलांना सखोल विचारासाठी जास्त वेळ मिळतो. पण त्याने याच्या एका तोट्याकडेही माझे लक्ष वेधले. काही लॉ फर्म्सनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये एआयमुळे चुकीची माहिती गेली आणि त्यामुळे त्यांना न्यायालयात नामुष्की सहन करावी लागली, अशी काही उदाहरणे त्याने सांगितली. त्याचे म्हणणे अगदी बरोबर होते. एआयच्या अथांग क्षमतेचा वापर करून व्यावसायिक आयुष्यात बदल घडवून आणणे ही केवळ कर्मचारी आणि त्यांच्या वरिष्ठांसमोरचीच आव्हानात्मक बाब नाही, तर ती प्रत्येक मालकासमोरील एक मोठे आव्हान आहे. जनरेटिव्ह एआयच्या मदतीने ज्युनियर्स पॉवरपॉइंट सादरीकरणे पटकन तयार करू शकतात. परंतु त्यांच्या बॉसला त्यातील तथ्यांची तपासणी करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागू शकतो. कार्यालयांमध्ये अशीही उदाहरणे घडली आहेत. तेथे चुकीची माहिती देणाऱ्या एआय बॉटमुळे कर्मचारी इतके वैतागले की, त्यांनी संतापाच्या भरात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना ‘मानसिकदृष्ट्या अस्थिर’ ठरवले गेले. त्यामुळे खरे आव्हान हे नाही की आपण एआयचा वापर करावा की नाही, तर खरे आव्हान हे आहे की आपण आपले किती काम त्याच्याकडे सोपवायचे. आपली जबाबदारी यंत्रावर सोपवू नका. एआय सादरीकरण तयार करू शकतो, पण कर्मचाऱ्याने प्रत्येक आकडेवारीची खात्री करून घेतली पाहिजे. तो एखाद्या कराराचा सारांश देऊ शकतो. पण वकिलाने महत्त्वाचे नियम स्वतःच वाचले पाहिजेत. एआय अहवाल तयार करू शकतो, पण सही करणाऱ्या व्यक्तीने सर्व तथ्ये अचूक असल्याची खात्री केली पाहिजे. तो उत्तरे सुचवू शकतो, पण माणसाने स्वतःला विचारले पाहिजे की, ‘हे योग्य वाटते का? यात काही राहून तर गेले नाही? काही चुकेल का?’ एआय उपलब्ध आहे म्हणून कोणीही त्याचा वापर करू नये. भविष्यातील कामाचे ठिकाण कदाचित एआय वापरणारे आणि न वापरणारे अशा दोन भागांत विभागले जाणार नाही, तर ते एआयचा समंजसपणे वापर करणारे आणि विचार करण्याचे कामच एआयवर सोडणारे, अशा दोन वर्गांत विभागले जातील. वॉर्सा येथील रोबोट कदाचित हीच मागणी करत होते की माणसाने ‘आपल्या कामाच्या जागेचे रक्षण करावे.’ पण माणसांना नोकरीपेक्षाही मौल्यवान असलेल्या एका गोष्टीचे रक्षण करण्याची गरज आहे—ती म्हणजे विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि स्वतः जबाबदारी घेण्याची आपली क्षमता. फंडा असा की - थोडक्यात काय तर, भविष्यात यंत्रासोबत मिळून काम करणाऱ्यांची किंमत वाढेल, स्वतःच यंत्र बनणाऱ्यांची नाही!

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *