Pune : पुण्यात पाच मित्रांनीच विकीचा खून केला; लातूरला पळ काढला, पण एका चुकामुळे बिंग फुटलं आणि सगळे आरोपी पकडले गेले

Pune : पुण्यातील खराडी भागात एका तरुणाचा निर्घृण खून करून फरार झालेल्या पाच सराईत गुन्हेगारांना लातूर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या कडेकोट बंदोबस्तादरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, एका व्हॉट्सॲप फोटोमुळे या गुन्हेगारांची ओळख पटली आणि लातूरच्या एमआयडीसी पोलिसांनी पुण्याच्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.

रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लातूरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे 'चार्ली पथक' भांबरी चौक ते साई नाका रिंगरोड परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका पेट्रोल पंपाजवळ अंधारात झाडाखाली पाच तरुण संशयास्पद रितीने बसलेले पोलिसांना आढळले. त्यांचे वय अवघे १८ ते २० वर्षे होते. पोलिसांनी हटकले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी पाचही जणांना ताब्यात घेतले.

Pune : साताऱ्यातील 27 वर्षीय तरुण अचानक बेपत्ता; 8 दिवसांनी पुण्यातील लॉजमध्ये मृतदेह आढळला, दुर्गंधीमुळे प्रकार उघड

ताब्यात घेतलेल्या तरुणांची सखोल चौकशी सुरू असतानाच, चार्ली पथकाने त्यांचे फोटो पुणे पोलिसांच्या अधिकृत ग्रुपवर शेअर केले. अवघ्या काही मिनिटांतच पुणे पोलिसांकडून दुजोरा मिळाला की, हे पाचही तरुण २४ जानेवारी रोजी पुण्यातील वाघोली-खराडी भागात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आहेत. त्यांच्यावर पुणे पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ (१) अन्वये गंभीर गुन्हा दाखल आहे.

कैलास विठ्ठल राठोड (रा. खराडी, पुणे), गणेश चंद्रकांत कट्टे (रा. खराडी, पुणे), सुशील सुभाष कदम (रा. खराडी, पुणे), करण विठ्ठल तुरे (रा. चंदन नगर, पुणे), रोहित विकास गायकवाड (रा. नानापेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

रात्री उशिरा १ वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईनंतर लातूर पोलिसांनी पाचही आरोपींना पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान चवरे आणि त्यांच्या टीमने ही धाडसी कारवाई पूर्ण केली.

मित्राच्या घरी जमलो, गप्पा गोष्टी झाल्या आणि क्षुल्लक वादातून मित्रांनीच मित्राचा काटा काढल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या वाघोली परिसरात घडली होती. शनिवारी (२४ जानेवारी) रात्री उशिरा वाघोलीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये २१ वर्षीय तरुणाची त्याच्याच पाच मित्रांनी गळा चिरून निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा थरार घडला, त्याच्या समोरच गुन्हे शाखेचे कार्यालय असूनही आरोपींनी हे धाडस केल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

मृत विकी विजय दिवटे (वय २१, रा. चंदननगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत) आणि त्याचे पाच मित्र शनिवारी रात्री वाघोलीच्या बायफ रोडवरील 'आर.पी.एस. हेरिटेज' सोसायटीमध्ये आले होते. या सोसायटीच्या १० व्या मजल्यावर राहणारा मित्र प्रतीक मोरे याच्या फ्लॅटवर हे सर्वजण जमले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात मित्रांनी विकीवर चाकूने सपासप वार केले. त्याचा गळा चिरल्याने रक्ताच्या थारोळ्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : पुण्यात पाच मित्रांनीच विकीचा खून केला; लातूरला पळ काढला, पण एका चुकामुळे बिंग फुटलं आणि सगळे आरोपी पकडले गेले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *