कोल्हापूर: गुंतवणुकीच्या परताव्याचे आमिष दाखवून अडीच कोटींची फसवणूक; कोकणातील कसाल-गिम्वी येथून तीन जणांना बेड्या

कोल्हापूर: 'टीडब्ल्यूजे लर्निंग सोल्यूशन्स' या कंपनीत गुंतवणूक केल्यास तीन ते पाच टक्के परतावा देण्याचे, तसेच १२ महिन्यांनंतर मूळ गुंतवणूक परत करण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची २ कोटी ५३ लाख ८७ हजार ३३९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

समीर सुभाष नार्वेकर (वय ३६), नेहा समीर नार्वेकर (वय ३६, रा. दोघेही, गिमवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि अमित विश्वनाथ बालम (वय ३८, रा. कसाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी सांगितले की, वीणा नितीन लकडे (वय ४१, रा. पुईखडी, राधानगरी रोड, कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १९ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला फिर्यादीसह अन्य नऊ गुंतवणूकदारांची मिळून ६४ लाख ९८ हजार ८९७ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या अन्य गुंतवणूकदारांनीही पुढे येऊन तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले होते.

त्यानंतर आणखी गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी केल्याने या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती वाढल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. संबंधित कंपनीमध्ये गुंतवणूकदारांनी एकूण ३ कोटी ९२ लाख ६० हजार रुपये गुंतविल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १ कोटी ३८ लाख ७२ हजार ६६१ रुपये परतावा देण्यात आला. मात्र २ कोटी ५३ लाख ८७ हजार ३३९ रुपये परत न केल्याने एवढ्या रकमेची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पाच टक्क्यांपर्यंत परताव्याचे आमिष
कोल्हापुरातील कावळा नाका, 'टीडब्ल्यूजे लर्निंग सोल्यूशन्स' होते. येथे गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. नऊ लाख रुपये गुंतविल्यास तीन टक्के परतावा, दहा लाख रुपये गुंतविल्यास चार टक्के आणि २५ लाख रुपये गुंतविल्यास पाच टक्के परतावा, तसेच १२ महिन्यांनंतर गुंतविलेली मूळ रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप आहे. गुंतवणुकीच्या हमीसाठी नोटरी करून देण्याचेही सांगण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


सतरा लाख भरले पण...
फिर्यादी वीणा लकडे यांनी एप्रिल २०२३ ते २१ मार्च २०२५ या कालावधीत बँकेमार्फत कंपनीत १७ लाख रुपये गुंतवले. आश्वासनानुसार परतावा तसेच मुदत पूर्ण झाल्यानंतर मूळ रक्कम परत करण्यात आली नाही. मार्च २०२५ पासून परतावा बंद करून आर्थिक फसवणूक केली. यामुळे लकडे यांनी पोलिसांत धाव घेतली.

सहापैकी तिघांना अटक
लकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकूण सहा संशयित आरोपी आहेत. यातील तिघांना अटक झाली आहे. उर्वरित चिन्मय पालकर, विजय पताडे, निखिल सुर्वे हे अजून फरार आहेत, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *