हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या

हिंगोली: "तू पोलिसांना आमच्या हालचालींची गुप्त माहिती (टिप) का देतोस?" या संशयावरून एका २२ वर्षीय तरुणाला भररस्त्यात अडवून विटा आणि दगडांनी ठेचून त्याची निघृण हत्या करण्यात आल्याची अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. हा रक्तरंजित प्रकार वसमत शहरातील सोमवार पेठ भागात गुरुवारी (दि. १०) सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडला. या घटनेने वसमत शहर आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"आमची टिप का देतोस?" म्हणून घातला वाद
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश डिगांबर गुंडाळे (वय २२, मूळ रा. रुपला पांढरी, ता. पूर्णा, जि. परभणी; सध्या रा. पाटील नगर, वसमत) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी मध्यरात्री १२:१५ वाजेच्या सुमारास गणेश हा सोमवार पेठ परिसरातून जात असताना, संशयित ऋषीकेश कठाळे, अर्जुन बोचकरी आणि अनिकेत देवकर (सर्व रा. वसमत) यांनी त्याला रस्त्यात अडवले. "तू पोलिसांना आमच्याविरोधात खबरी का पुरवतोस?" असा जाब विचारत त्यांनी गणेशसोबत जोरदार वाद सुरू केला.

विटा आणि दगडांनी ठेचून जागीच संपवले
हा वाद काही मिनिटांतच टोकाला पोहोचला आणि तिघांनी गणेशला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. संतापाच्या भरात आरोपींनी रस्त्याच्या बाजूला पडलेल्या बांधकाम विटा आणि मोठे दगड उचलून गणेशच्या डोक्यावर आणि छातीवर एकापाठोपाठ एक जोरदार वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की गंभीर दुखापत झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गणेशचा जागीच तडफडून मृत्यू झाला. हत्येनंतर तिन्ही हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.

पोलीस पथक घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच वसमत शहर पोलीस दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, सहायक पोलीस निरीक्षक परगेवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले व सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
शोधमोहीम तीव्र, दोन तपास पथके रवाना प्रत्यक्षदर्शी पवन डाखोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुरुवारी पहाटे आरोपी ऋषीकेश कठाळे, अर्जुन बोचकरी आणि अनिकेत देवकर या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. फरार आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी दोन विशेष शोध पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना केली असून, आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी व्यक्त केला आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *