पुणे: कात्राज-कोंढवा रस्ता बनला मृत्यूचा सापळा! महापालिका आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणखी एका निष्पाप तरुणीचा बळी

पुणे: प्रशासकीय अनास्था, रखडलेले रस्ते यामुळे पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर झालेल्या दुर्दैवी अपघातात एका निष्पाप चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला. हा अपघात आहे की, मनपा प्रशासनाकडून झालेला 'प्रशासकीय खून'? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
कात्रज-कोंढवा रोडवरील सिल्वर ओक सोसायटीच्या समोर दुचाकी (MH12-ZM 3579) व कंटेनर (HR 38 W 6977) मध्ये झालेल्या अपघातात प्रतिभा ज्ञानेश्वर नाईक (वय १६) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर वैष्णवी ज्ञानेश्वर नाईक या विद्यार्थिनीचे मांडीचे हाड फॅक्चर असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रतिभा व वैष्णवी नाईक या दोघी बहिणी असून, राजस सोसायटी येथील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी विद्यालयात दहावी वर्गात शिकत आहेत. वडील ज्ञानेश्वर नाईक हे आपल्या दुचाकीवरून शाळेतून घरी जात असताना हा गंभीर अपघात घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या सहा. पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात व वाहतूक विभागाचे प्रशांत खेडकर घटनास्थळी पोहोचले. प्रतिभा हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून येथे पाठवण्यात आला आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, अपूर्ण उड्डाणपूल, आणि कोणतीही शिस्त नसलेली अवजड वाहतूक यामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी रोज मृत्यूचा सापळा ठरत आहे. दररोज हजारो नागरिक या रस्त्यावरून प्राणाची बाजी लावून प्रवास करतात. जबाबदार अधिकाऱ्यांचे डोळे उघडायला आणखी किती बळी जावे लागणार आहेत?


आज (दि. ८) झालेल्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिक आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला. केवळ अपघाताचा गुन्हा नोंदवून चालणार नाही, तर हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली जात आहे. भूसंपादनाचे कारण पुढे न करता महापालिकेने हे काम तातडीने मार्गी लावावे, अशी देखील मागणी होत आहे. दहावीतील लहान मुलगी गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


ज्ञानेश्वर नाईक हे मूळचे नांदेडचे असून पुण्यातील एका खासगी शाळेत ते वॉचमनचे काम करतात. कात्रज परिसरातील गुजरवाडी फाटा येथे राहत असून, त्यांना एकूण चार मुली आहेत. दहावीला असणाऱ्या दोन मुलींना घरी घेऊन जाताना अपघात झाला व एकीचा जागेवर मृत्यू झाला. इतर दोन मुली या इयत्ता चौथी व इयत्ता सातवीमध्ये शिकत आहेत. त्यांच्या पत्नी देखील एका खासगी कंपनीत काम करतात. जखमी असलेल्या वैष्णवीचे ऑपरेशन करावे लागणार असल्याची माहिती मिळाली. अतिशय गरीब असणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


"कात्रज-कोंढवा रस्त्यावर अतिशय मनमानी कारभार सुरू असून, ना स्पीड ब्रेकर, ना वाहतूक पोलिस वाहनचालक कुठूनही कसेही उलटी सुलटी वाहने घेऊन जातात. कोणालाही कशाचीच भीती नाही, एवढा मोठा चौक असताना कोणीही ट्रॅफिकवाले तिथे ट्रॅफिक कंट्रोलला नसतात. त्यामुळेच आज एका निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला. अरविंद मोरे, नागरिक."



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *