भीमाशंकर: कुठे गेला दीपक? ओढ्याकाठी कपडे, चप्पल अन् मोबाईल सापडला; मुसळधार पावसात पाण्याच्या मोटारीसाठी गेलेला १७ वर्षीय तरुण अजूनही बेपत्ता

भीमाशंकर: आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी गावाजवळ एक अत्यंत दुर्दैवी व चिंतेत टाकणारी घटना घडली आहे. डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पिंपरी पुलाजवळील ओढ्यामध्ये पाण्याची मोटार काढण्यासाठी गेलेला १७ वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण परिसरात भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत असली, तरी मुसळधार पावसामुळे आणि पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव दीपक सुरेश खाडे (वय १७ वर्षे, रा. पिंपरी) असे आहे. बुधवारी सकाळी दीपक हा आपल्या मोठ्या भावासोबत पिंपरी पुलाजवळील ओढ्यावर पाण्याची मोटार काढण्यासाठी गेला होता. काही वेळ झाल्यानंतर त्याचा भाऊ विकास खाडे हा आंघोळीसाठी घरी परतला. मात्र, बऱ्याच वेळ होऊनही दीपक घरी न परतल्यामुळे विकासला संशय आला आणि तो पुन्हा ओढ्याकडे धावला. घटनास्थळी पोहोचल्यावर विकासला धक्काच बसला, कारण दीपकचे कपडे, चप्पल आणि मोबाईल फोन ओढ्याच्या काठावर व्यवस्थित ठेवलेले आढळले.

या प्रकारानंतर विकासने तातडीने आजूबाजूच्या परिसरात दीपकचा शोध घेतला आणि मोठ्याने हाका मारल्या, मात्र त्याचा कोणताही पत्ता लागला नाही किंवा काहीच मागमुस लागला नाही. त्यानंतर घाबरलेल्या ग्रामस्थांनी व कुटुंबीयांनी तातडीने घोडेगाव पोलिसांना या घटनेची सविस्तर माहिती दिली. माहिती मिळताच घोडेगाव पोलीस, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, पोलीस पाटील, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या मदतीने युवकाचा शोध घेण्यासाठी तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.

दरम्यान, भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यामध्ये मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नाले, ओढे आणि नद्या दुथडी भरून अतिशय वेगाने वाहत आहेत. ओढ्यातील पाण्याच्या वेगामुळे व प्रचंड प्रवाहामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी येत असून सायंकाळपर्यंत दीपकचा शोध लागलेला नव्हता. या आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांना विशेष आवाहन केले असून, मुसळधार पावसाच्या काळात ओढे, नाले आणि नदीपात्राजवळ जाणे टाळावे तसेच कोणतीही अनावश्यक जोखीम पत्करू नये, असे बजावले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *