The Shade Solution: Solapur Heat Study Shows Tree-Lined Streets are 3 Degrees Cooler

वृक्षवल्लीची साथ, तरच उन्हाची मात! सोलापुरात झाडे असलेल्या आणि नसलेल्या रस्त्यांवरील तापमानात ३ अंशांचा फरक

The Shade Solution: Solapur Heat Study Shows Tree-Lined Streets are 3 Degrees Cooler
सोलापूर: 'झाडे लावा, झाडे वाचवा' हा केवळ एक नारा नसून ते काळाची गरज आहे, हे सोलापूर शहरात करण्यात आलेल्या एका प्रयोगातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कडक उन्हात दुपारी १.३० ते २ या वेळेत केलेल्या एका निरीक्षणात असे दिसून आले की, ज्या रस्त्यावर झाडांची दाट सावली आहे, तिथे तापमान नियंत्रणात आहे; मात्र जिथे झाडे नाहीत, तिथे तापमानाचा पारा चटका लावणारा आहे.

प्रत्यक्ष प्रयोगातून वास्तव समोर
शहरातील दोन प्रमुख मार्गांवर थर्मामीटरच्या साहाय्याने तापमान मोजले असता धक्कादायक वास्तव समोर आले:
१. व्हीआयपी रोड (संगमेश्वर कॉलेज ते जुना एम्प्लॉयमेंट चौक): या रस्त्याच्या दुतर्फा मोठी आणि गर्द झाडी आहे. भर उन्हात इथे तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दाट सावलीमुळे पादचाऱ्यांची येथे मोठी वर्दळ दिसून आली.
२. सात रस्ता ते रेल्वे स्थानक मार्ग: या मार्गावर वृक्षराजीचा अभाव असून मोठ्या प्रमाणात डांबरीकरण आहे. इथे थर्मामीटरवर थेट ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. झाडे नसल्यामुळे केवळ ५०० मीटरच्या अंतरावर तापमानात ३ अंशांची मोठी वाढ दिसून आली.

तज्ज्ञांचा इशारा: ४३ अंशांवर उष्माघाताचा धोका
फिजीशियन डॉ. सुनील गोविंदे यांच्या मते, ४० अंश तापमानात शरीरातून प्रचंड घाम येतो, ज्यामुळे थकवा आणि डिहायड्रेशन जाणवते. मात्र, तापमान ४३ अंशांच्या पुढे गेल्यास शरीराची नैसर्गिक शीतकरण यंत्रणा कोलमडू शकते. यामुळे उष्माघात (Heat Stroke) होऊन अंतर्गत अवयवांना गंभीर इजा होण्याचा धोका असतो.

डांबरीकरण आणि 'अर्बन हीट आयलंड'
हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी स्पष्ट केले की, सिमेंट आणि डांबर उष्णता लवकर शोषून घेतात आणि ती वातावरणात परावर्तित करतात. यामुळे शहरात 'अर्बन हीट आयलंड' तयार होत आहेत. २००१ ते २०२४ या काळात महाराष्ट्राने सुमारे २२,४०० हेक्टर वृक्षच्छादित क्षेत्र गमावले आहे. झाडे केवळ सावली देत नाहीत, तर ती 'नैसर्गिक एअर कंडिशनर' सारखे काम करतात.

देशी वृक्षांची लागवड हाच एकमेव पर्याय
वाढत्या सिमेंटच्या जंगलात सोलापूरचे तापमान नियंत्रणात ठेवायचे असेल, तर रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागी देशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करणे हाच एकमेव वैज्ञानिक आणि शाश्वत उपाय आहे. जर आपण आताच सावध झालो नाही, तर भविष्यात सोलापूरचे तापमान नवे उच्चांक गाठेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *