Pune : बारामती पोटनिवडणूक, सुनेत्रा पवार यांचा प्रचार शुभारंभ; कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नव्या नेतृत्वाला संधी, ‘दादांचे स्वप्न पूर्ण करू’

Pune : कन्हेरी येथील ऐतिहासिक मारुती राय मंदिरात दर्शन घेतल्यानंतर नारळ फोडून महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी रणनीतीवर स्पष्ट भूमिका मांडली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आगामी काळात विकासकामे आणि संघटनात्मक बांधणी करताना प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरविली जाईल. केवळ सतरंज्या उचलायच्या नाहीत, या जुन्या भावनेला पूर्णविराम देण्यात येईल. प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान दिला जाईल. नव्या दमाच्या सक्षम आणि कार्यक्षम युवकांना पुढे आणण्यासाठी ठोस निर्णय घेत त्यांना जबाबदारी आणि संधी उपलब्ध करून दिली जाईल.”
बारामतीची पोटनिवडणूक ही केवळ निवडणूक नसून ऐतिहासिक जबाबदारी असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, “ही जबाबदारी माझ्यावर आणि संपूर्ण बारामतीकरांवर आहे. दोन महिन्यांपूर्वी नियतीने क्रूर खेळ केला. दादा आपल्याला सोडून गेले. त्यांच्या निधनानंतर अलोट जनसागराने श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण देशाला दादा काय चीज होते, हे समजले. विमान अपघातात विखुरलेले कागदपत्रे त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत असलेल्या कार्यमग्नतेची साक्ष देत होते.”

दादांच्या नंतर महिला म्हणून जबाबदारी पार पाडता येईल का, याबाबत अनेकांना संशय होता, असे सांगताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “मात्र दादांच्या आशीर्वादाने ही जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आणि लढण्याचे बळ दिले. मी राज्याला पहिले महिला धोरण देणाऱ्या परिवाराची सून आहे. तरीही कोणीही माझ्या कामाचे मूल्यांकन केवळ महिला म्हणून करू नये, असे मला वाटते.”

दादांच्या निधनानंतर बारामती तालुक्यातील यात्रा, जत्रा आणि उरुस अतिशय साधेपणाने साजरे झाल्याचे सांगताना त्यांनी बारामतीकरांच्या नेत्यांविषयीच्या अपार प्रेम आणि श्रद्धेचे दर्शन घडले असे म्हटले. “बारामतीकरांच्या या विश्वासाला पात्र ठरून दादांच्या स्वप्नातील सुंदर आणि विकसित बारामती घडवण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी काम करेन,” अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सभेचे वातावरण भावुक झाले होते.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सभेला संबोधित करताना म्हटले, “संकट अंगावर घेणारा आणि कामाचा धडाका लावणारा नेता आपल्यात नाही, याची सर्वांना जाणीव आहे. मतदारांचा आवाज मुंबईत नव्हे तर दिल्लीत पोहोचला पाहिजे, असे मतदान करा. कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवावेत. पवार कुटुंबाचे विचार मनात न आणता आपण सर्वजण पवार कुटुंबाचे देणे लागतो, हे मतदानातून सिद्ध करा.”

मंत्री आदिती तटकरे यांनी अजितदादांच्या आठवणींनी भारावून जाऊन भाषण केले. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले. यावेळी आमदार सुनील शेळके, दिलीप वळसे पाटील, सना मलिक, विश्वास देवकाते, भाजपचे अविनाश मोटे आदींनीही आपले विचार मांडले.

उपस्थित मान्यवर: जय पवार, रुतुजा पवार, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, पृथ्वीराज जाचक, वीरधवल जगदाळे, दिगंबर दुर्गाडे, सचिन सातव, किरण गुजर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि बारामतीकर उपस्थित होते.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *