Mumbai : गॅसचं बिल फक्त ११०० रुपये, पण व्यावसायिकाला बसला १२ लाखांचा फटका; युद्धसदृश परिस्थितीचा चोरांनी घेतला फायदा

Mumbai : आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा गैरफायदा सायबर चोरांकडून घेतला जात आहे. गॅस बिल भरले नाही किंवा अपडेट झाले नाही, अशा बनावट संदेशांच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशाच एका प्रकरणात मुलुंडमधील एका व्यावसायिकाला १,१०० रुपयांच्या गॅस बिलाच्या बहाण्याने तब्बल १२ लाख रुपयांचा फटका बसला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईतील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या मोबाइलवर गुरुवारी एक संदेश आला. “तत्काळ गॅस बिल भरा, अन्यथा गॅस कनेक्शन तोडण्यात येईल,” असा इशारा त्या संदेशात देण्यात आला होता. आधीच गॅस टंचाईची परिस्थिती असल्याने कनेक्शन बंद होऊ नये, या भीतीपोटी व्यावसायिकाने तत्काळ १,१५० रुपये भरले.

यानंतर काही वेळातच त्यांना एका व्यक्तीचा फोन आला. संबंधिताने स्वतःला महानगर गॅस कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगत बिलाबाबत विचारणा केली. व्यावसायिकाने बिल भरल्याचे सांगितल्यावर, “बिल अपडेट झालेले नाही,” असे सांगत त्याने ते अपडेट करण्यासाठी एक एपीके (APK) फाइल पाठवली.

विश्वास ठेवून व्यावसायिकाने ती फाइल डाउनलोड करून उघडली आणि ज्या बँक खात्यातून पैसे भरले होते त्याची माहिती टाकली. सबमिट करताना आलेला ओटीपीही त्यांनी टाकला. मात्र, ओटीपी टाकताच त्यांच्या खात्यातून सुमारे १२ लाख रुपये परस्पर वळवण्यात आले.

खात्यातून पैसे जात असल्याचे संदेश येताच व्यावसायिकाने तातडीने बँकेशी संपर्क साधून पुढील व्यवहार थांबवले. त्यानंतर ही सायबर फसवणूक असल्याचे लक्षात येताच त्यांनी पूर्व विभाग सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *