एन. रघुरामन यांचा कॉलम:दररोज संडेसारखा अनुभव- ‘पीक जेन’ कसे साध्य करावे?

रविवारच्या एका शांत सकाळची कल्पना करा. आकाशात ढग दाटून आले आहेत, खिडकीवर हलकीशी पावसाची सर पडत आहे आणि हवामान अगदी आल्हाददायक आहे. कोणतीही घाई नाही, तयार होण्याचे कोणतेही दडपण नाही आणि ऑफिसलाही जायचे नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शांतपणे बसला आहात- एका हातात चहा, दुसऱ्या हातात सकाळचे वर्तमानपत्र. तेवढ्यात थंड हवेची एक झुळूक तुमच्या गालाला स्पर्श करते आणि तुम्ही दोघेही डोळे मिटून घेता. कोणत्याही पूर्वनियोजनाविना तुम्ही एका पूर्ण शांततेच्या अवस्थेत पोहोचता. जग जणू दिसेनासे होते. तुमचा चहा थंड होत आहे, पण तुम्हाला त्याची पर्वा नाही. तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात. जेव्हा शेवटी तुम्ही तुमचे डोळे उघडता तेव्हा तुमच्यापैकी एक जण हळूच म्हणतो, ‘काय उत्तम रविवार आहे’. दुसरा फक्त होकारार्थी मान हलवतो. आपण आपले संपूर्ण आयुष्य नेमक्या याच अनुभूतीच्या शोधात घालवतो. पण तो क्षण इतका परिपूर्ण का होता? असे यासाठी नव्हते की तुमच्या घराचे कर्ज फिटले होते किंवा नुकताच तुमचा पगार बँक खात्यात जमा झाला होता. हे यासाठीही नव्हते की तो वीकेंड होता. तो क्षण यासाठी परिपूर्ण होता. कारण काही निवांत मिनिटांसाठी तुमचे लक्ष केवळ एकाच गोष्टीवर केंद्रित होते- तुमचा श्वास. स्वतःचा वेग मंदावून तुम्ही तुमच्या मेंदूला त्याच्या ‘फाइट-ऑर-फ्लाइट’ मोडमधून बाहेर काढले होते आणि तुमच्या पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टिमला- शरीराच्या स्वाभाविक ‘रेस्ट-अँड-डायजेस्ट’ प्रतिसादाला सक्रिय केले होते. तुम्ही तुमच्या मेंदूला असा संकेत दिला की तुम्ही सुरक्षित आहात, ज्यामुळे वर्षानुवर्षे साचलेला ताण वितळू लागला.याला स्थिरतेचे विज्ञान म्हणतात. त्या काही शांत मिनिटांमध्ये तुमच्या शरीराच्या आत एक अद्भुत जैविक बदल झाला होता. तुमच्या हृदयाची गती मंदावली होती. रक्तदाब कमी झाला होता. तणावाचे प्रमुख संप्रेरक कॉर्टिसोल वेगाने कमी झाले होते. मेंदूचे भावनिक फिअर-सेंटर अमिग्डाला शांत झाले होते, तर तर्कसंगत विचार आणि भावनिक संतुलनावर नियंत्रण ठेवणारा प्री-फ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय झाला होता. आपले पूर्वज ही अवस्था दररोज साधत असत आणि याला ते ध्यान म्हणायचे. आजचे आधुनिक शास्त्रज्ञ याला ‘पीक जेन’ म्हणतात- सखोल रिलॅक्सेशन, मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलनाची सर्वोच्च अवस्था. शेवटी ‘पीक जेन’ किंवा ध्यान म्हणजे काय? हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील भूलतज्ज्ञ प्राध्यापक डॉ. बाला सुब्रमण्यम- ज्यांचे काम प्राचीन ध्यान-विज्ञान आणि आधुनिक वैद्यकशास्त्राची सांगड घालते- याबद्दल सोप्या शब्दांत सांगतात : ‘ध्यानाचे ध्येय अशा अवस्थेत पोहोचणे हे आहे, जिथे तुम्ही तुमच्या विचारांना येता-जाताना पाहता, पण त्यांच्यात अडकत नाही.’ ध्यानाचा अर्थ मनाला जबरदस्तीने रिकामे करणे असा नाही. याचा अर्थ आपल्या मानसिक उलथापालथीमध्ये सहभागी न होता त्याचे तटस्थ साक्षीदार बनणे हा आहे. जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा तुमचे मन मंदावू लागते. यातून एका अशा प्रक्रियेला सुरुवात होते, ज्याला शास्त्रज्ञ ‘टाइम-डायलेशन’ म्हणतात. हे अगदी त्याच ‘फ्लो-स्टेट’सारखे आहे, ज्याचा अनुभव सर्वोच्च स्तरावरील खेळाडू घेतात. विश्वचषकातील जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंची कल्पना करा. चेंडू गोलपोस्टच्या आत पोहोचवण्याआधीच्या एका क्षणी प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टेडियम त्यांच्यासाठी जणू पूर्णपणे अदृश्य होते. गोंधळ संपुष्टात येतो. वेळ जणू विस्तारू लागते. त्यांना बचाव फळीमध्ये एक छोटीशी मोकळी जागा दिसते आणि ते शॉट मारतात. ध्यानदेखील तुम्हाला थेट तशाच हायपर-फोकस्ड स्पष्टतेच्या अवस्थेत घेऊन जाते, जिथे बाह्य जगाचा गोंधळ मंदावतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या आंतरिक प्रज्ञेपर्यंत पोहोचू शकाल. म्हणूनच स्थिरता हा उत्पादकतेचा सर्वात प्रभावी उपाय आहे. मनात सुरू असलेला गोंधळ शांत करण्याचा दैनंदिन सराव मेंदूच्या नैसर्गिक न्यूरोप्लास्टिसिटीचा वापर करत तुमच्या न्यूरल-पाथवेजला पूर्णपणे आनंदासाठी री-वायर करून टाकतो. तुमच्या मनासाठी हे स्मरणशक्ती तीक्ष्ण करते, सखोल एकाग्रता वाढवते आणि रोजच्या निराशेचा सामना करण्यासाठी तुम्हाला मनोवैज्ञानिकदृष्ट्या मजबूत बनवते. तुमच्या शरीरासाठी हे दीर्घकालीन इन्फ्लमेशन कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवते आणि झोपेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवून आणते. फंडा असा आहे की, ध्यान वास्तवात तुमचा वेळ घेत नाही, तर ते तुमच्यासाठी वेळ वाचवते. हे मनात सतत सुरू असणारा गोंधळ शांत करते, ज्यामुळे तुम्ही अधिक सजग, अधिक शांत आणि पूर्णपणे वर्तमानात उपस्थित राहता. दररोज संडेवाली फिलिंग अशीच मिळते.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *