पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले

पुणे: पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना भामट्यांनी आपले लक्ष्य बनवले आहे. गेल्या काही दिवसांत येथे एटीएम फसवणुकीच्या घटनांत मोठी वाढ झाली असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आठवडाभरातच दोन मोठ्या फसवणुकीच्या घटना समोर आल्याने बँकांची सुरक्षा व्यवस्था आणि संबंधित यंत्रणांची कार्यपद्धती पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्हाखाली आली आहे.

नेमका प्रकार काय? गेल्या आठवड्यात पिंगोरी येथील एका शेतकऱ्याच्या एसबीआयच्या एटीएममध्ये कार्ड बदलून ३० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेची धूळ बसते न बसते तोच गुरुवारी राख येथील मेंढपाळ व्यावसायिक अण्णा महानवर यांना फसवणुकीचा फटका बसला. अण्णा महानवर हे महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना "मी मदत करतो" असे सांगत विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेऊन त्याने काही क्षणांतच त्यांच्या खात्यातील ४० हजार रुपये काढून घेतले आणि तो तिथून पसार झाला.

 

 

यंत्रणेच्या दिरंगाईमुळे फसवणुकीला बळ फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महानवर यांनी तातडीने शेजारील बँकेत धाव घेतली. मात्र, बँक कर्मचाऱ्यांनी साधी विचारपूस करण्याऐवजी दाद दिली नसल्याचा आरोप पीडिताने केला आहे. त्यानंतर त्यांनी नीरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथेही त्यांना पोलिसांकडून "तिकडे जा, अर्ज करा, तक्रार करा" अशा स्वरूपाची बोळवण सहन करावी लागली. यामुळे संतापलेल्या पीडिताला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा लेखी तक्रार नोंदवण्यासाठी हेलपाटे मारावे लागले.

एटीएम केंद्रांवरील सुरक्षारक्षकांचा अभाव, सीसीटीव्ही फुटेजची वेळेवर पडताळणी न होणे आणि तक्रार निवारणासाठी बँकांकडून दाखवली जाणारी अनास्था यामुळे भामट्यांचे धाडस वाढले आहे. नागरिकांच्या कष्टाचे पैसे क्षणात चोरीला जात असताना, जबाबदार बँका आणि पोलीस प्रशासन जबाबदारी झटकत असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *