पुणे: चाकणमधील खड्ड्यांचा विळखा; अपघात झाल्यास थेट संबंधित विभागावर होणार कारवाई; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा

पुणे: चाकण एमआयडीसी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पीएमआरडीए आणि एमआयडीसी यांच्या अखत्यारीतील सर्व रस्ते येत्या दि. २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्यात यावेत. त्यानंतर आपण प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे सांगून निर्धारित मुदतीनंतर अतिक्रमणे काढली नाहीत, तर कार्यवाही होईल. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

चाकण परिसरातील रस्त्यातील खड्डे, वाहतूक व्यवस्था, पावसाळ्यातील उपाययोजना तसेच नदी, नाल्यातील अतिक्रमणांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नीलेश मोडवे, एमआयडीसीचे वरिष्ठ तांत्रिक सल्लागार संजयकुमार मांगीलवार, पीएमआरडीएचे शिवकुमार गोपाल, चाकण वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त गुलाब इनामदार, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता प्रवीण सुमंत उपस्थित होते.

डुडी म्हणाले, "चाकण परिसरातील नदी, नाले तसेच सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे संबंधितांनी एका महिन्याच्या आत स्वखर्चाने काढून घ्यावीत. मुदत संपल्यानंतरही अतिक्रमणे कायम राहिल्यास प्रशासनामार्फत ती हटविण्याची कारवाई करण्यात येईल. अतिक्रमण हटविण्यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. तसेच संबंधितांविरुद्ध प्रचलित कायदे व नियमांनुसार कारवाईही करण्यात येईल. रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेऊन सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने निश्चित कालमर्यादत पूर्ण करावीत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रस्त्यांवरील खड्डे आणि अतिक्रमणांच्या प्रश्नावर कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही."


बैठकीत चाकण परिसरातील रस्त्यांच्या सद्यःस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः तळेगाव चौक, राणूबाईमळा, खराबवाडी, वाघजाई नगर-खराबवाडी रोड, म्हाळुंगे इंगळे येथील सर्व चौक, खालुंब्रे येथील सर्व चौक, शिंदे वासुली येथील सर्व चौक, आंबेठाण वाय कॉर्नर, कोरेगाव फाटा तसेच बिरदवडी फाटा, दवने मळा ते द्वारका सिटी रोड, कॉर्निंग कंपनी ते राष्ट्रीय महामार्ग पुणे-नाशिक या ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून, अपघातांचा धोका वाढला असल्याची नोंद घेण्यात आली. या सर्व ठिकाणी तातडीने खड्डे बुजविणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे, रस्त्यांच्या कडांची सुधारणा करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना राबविण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *