विनाशाच्या उंबरठ्यावर उभे असलेले जग आणि युद्धाच्या छायेत हरवलेली मानवकल्याणची साद

Atomic शक्तीमुळे बलाढ्य झालेली राष्ट्र स्वतःला काय समजतात? ही पृथ्वी यांच्या मालकीची आहे काय? रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू असतानाच इस्रायल-पॅलिस्टाईन, इराण, अमेरिका यांच्यात सुरू झालेलं हे युद्ध कधी आणि कोण थांबवणार? सैनिकी हल्ल्यांचे व्हिडिओ अतिशय भयावह आहेत. अनेक शहरांमध्ये मृत्यूचे तांडव सुरू आहे. बॉम्ब हल्ल्यांमध्ये इमारती पत्त्याच्या महलासारख्या पडत आहेत. सामान्य नागरिक, स्त्रिया आणि मुले आपले प्राण वाचवण्यासाठी देश सोडून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. किती हे विदारक चित्र आहे!

जगातील सगळ्या जबाबदार राष्ट्रप्रमुखांना यामागील भीषण भविष्य जाणवत नाही का? कुणीतरी या युद्धाला आवरायला हवं आहे. ऑक्सिजन बॉम्ब, फॉस्फरस बॉम्ब, मिसाईल्स, हे चाललंय तरी काय? हे भीषण तांडव थांबवण्यासाठी आता सगळ्या चर्चा आणि राजकारण विफल होताना दिसत आहेत.

जगातील सगळेच देश एकमेकांविरुद्ध उभे राहिले तर भविष्यात काय घडेल, याची कल्पना सुद्धा करवत नाही. युद्धाच्या उंबरठ्यावर संपूर्ण जग उभे आहे. प्रत्येक देशाने आपापली संहारक शस्त्रे उपसली तर काय अनर्थ घडेल? कुणीच कसा हा विचार करत नाही? गेल्या पन्नास-साठ वर्षांत भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी मानवाने आपली अफाट बुद्धिमत्ता वापरून सुखसोयी निर्माण केल्या, मोठमोठ्या टोलेजंग इमारती आणि सुंदर शहरं वसवली; पण मनात एवढी असुया आणि द्वेषभावना ठेवून काय साध्य होणार आहे? आपण स्वतः निर्माण केलेलं स्वतःचंच घर मोडायला निघालो आहोत.

सगळ्या देशांजवळ सध्या अण्वस्त्रांचा साठा कमी-अधिक प्रमाणात आहे. या अण्वस्त्रांचे नक्की काय करणार? तर, एकमेकांविरुद्ध वापरणार, हेच त्याचे एकमेव उत्तर आहे. अण्वस्त्रांनी काय कधी विकासाची कामे केली जातात का? मुळीच नाही! मग स्वतःच्या बचावासाठी संतापाच्या भरात अण्वस्त्रांचा वापर केला तर काय होईल?

तर काय घडेल हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. आज संपूर्ण जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे आणि जर काही सशक्त, सक्षम शांततावादी हात पुढे आले नाहीत, तर मानवाचा हा विनाश अटळ आहे. दुसऱ्या महायुद्धात जगाने रेडिएशनच्या धोक्याचा अत्यंत भयानक अनुभव घेतला आहे. यात केवळ मनुष्यहानीच नाही, तर निसर्गाची अपरिमीत आणि कधीही भरून न निघणारी हानी होणार आहे.

जंगलात प्राण्यांचे आपापसात कधी युद्ध झालेच तर काही प्रमाणात वातावरण ढवळून निघते आणि काही काळातच सगळं पूर्ववत शांत होते; पण मानवाचं आपसातील हे युद्ध मात्र जीव, संपत्ती आणि निसर्गाची कधीही भरून न निघणारी हानी करणारे ठरत आहे. हे युद्ध वेळीच थांबायला हवे.

दोन देशांच्या वैमनस्यातूनच या विनाश पर्वाची सुरुवात होते. जमिनीचा विस्तार, सत्तेचा लोभ किंवा धर्मद्वेष यांसारख्या संकुचित कारणांमुळे जोपासले गेलेले वैमनस्य शेवटी युद्धाच्या अत्यंत दुर्दैवी निर्णयावर येऊन थांबते. युद्ध म्हणजेच विनाश, अथांग मनुष्यहानी, जीवहानी आणि मुख्य म्हणजे युद्धामुळे संपूर्ण निसर्गाची होणारी अपरिमित हानी! डावपेच, सत्तेची हाव आणि क्रौर्य म्हणजेच आजचे युद्ध बनले आहे.

आज युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असलेले युक्रेन, रशिया, चीन, तायवान, इस्रायल, पॅलिस्टाईन, इराण आणि संपूर्ण युरोप यांसारखे अण्वस्त्रधारी देश कोणत्याही परिणामांची पर्वा न करता या युद्धा रुपी विनाशाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहेत. उद्या नक्की काय घडेल याचा विचार करणं सुद्धा अत्यंत भयावह आहे. मनुष्यप्राण्याने एवढा मोठा वैज्ञानिक विकास केला, पण त्याचा शेवट जर असा विनाशात झाला, तर ती मानवाच्या बुद्धीची सर्वात मोठी अधोगती ठरेल.

हे ईश्वरा, या बुद्धीचे वरदान लाभलेल्या मानवाला थोडी सदिच्छा आणि सुबुद्धी दे!

— सुहास सोहोनी

(माझ्या संवेदना)

संपर्क: ९४०५३४९३५४



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *