हवामान: जुलैअखेरीस महाराष्ट्रात कोसळधारा, ऑगस्ट येताच पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज

हवामान: राज्यात गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र पावसाने थैमान घातलं आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर काहीशी उसंत घेतलेला पाऊस गेल्या चार दिवसांत पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत रात्री झालेल्या पावसानंतर गुरुवारी सकाळी पालघर जिल्ह्याचा इशारा अद्ययावत करून रेड ॲलर्ट जाहीर करण्यात आला. दुपारी ठाणे जिल्ह्यासाठीही रेड ॲलर्ट जारी करण्यात आला होता. पालघर जिल्ह्यात दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा जोर कायम होता.

पूर्व व पश्चिम अशा विरुद्ध दिशांकडून येणाऱ्या वाऱ्यांचे क्षेत्र (शिअर झोन) दक्षिण गुजरातवर सक्रिय असल्याने त्याचा परिणाम पालघर, उत्तर मुंबईवर झाला. हा प्रभाव पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या तिन्ही जिल्ह्यांना ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. पुण्यातही सर्वदूर कोसळधारा पाहायला मिळाल्या असून रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. पुढील दोन दिवस पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून, घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे. घाटासाठी 'रेड अलर्ट' देखील जाहीर करण्यात आला होता.

 

मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून आषाढी एकादशीच्या दिवशीही कोकण विभागात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, २६ जुलैपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या पुढील दोन आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार, २३ ते ३० जुलै आणि ३० जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत राज्यात पावसाचा जोर कमी राहू शकतो. कोकण विभागातही या दोन्ही आठवड्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *