Chiplun Rain : पुराच्या भितीने नागरिकांनी रात्र काढली जागून; अनेकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी

चिपळूण - शहर आणि तालुक्यात पावसाचा जोर वाढल्यानंतर वाशिष्ठी नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे प्रशासनाची यंत्रणा रात्रभर जागी राहिली. सर्वच अधिकारी रात्रभर अलर्ट मोडवर होते. पाणी भरण्याच्या भितीने आणि केव्हाही स्थलांतरित होण्याच्या शक्यतेने नागरिकांनीही रात्र जागून काढली. नागरिकांना पाणी भरण्याची भिती होती. याच भितीने प्रशासन सज्ज असल्याचे दिसून आले.

बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरित केले आहे. शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली. नाईक कंपनी, ओसवाल शॅापी, वडनाका, मुरादपूर, सांस्कृतिक केंद्र, पेठमाप येथील काही व्यक्तींना स्थलांतरित केले आहे. मंगळवारी (ता. १८) सायंकाळपासून तालुक्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची झोप उडवली.
 
शहर आणि तालुक्यात पाऊस धो-धो कोसळत आहे. नाईक कंपनीजवळ वाशिष्ठी नदीवरील पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी मोजली जाते; मात्र शहराच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरवात झाल्यानंतर नागरिकांच्या मनात पुराची भिती निर्माण झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी भिती वाढली.

कोळकेवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे शहरात पाणी भरते, असा नागरिकांचा समज आहे. त्यामुळे जो तो अधिकाऱ्यांना फोन करून कोळकेवाडी धरणातून पाणी सोडणार आहे का, याची विचारणा करत होता. बाहेरगावचे नातेवाईक शहरातील नागरिकांना फोन करून पावसाची माहिती घेत होते. वाशिष्ठी नदीकिनारी राहणाऱ्या भागातील नागरिकांनी पुराच्या भितीने आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरवात केली.

महापुराच्या काळात अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी आपली वाहने शहराच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी धडपड करत होते. वाशिष्ठी नदीत ५ मीटरने पाण्याची पातळी वाढली तर नागरिकांना अर्लट राहण्याचा इशारा दिला जातो.

पाण्याची पातळी ७ मीटरने वाढली तर धोक्याचा इशारा दिला जातो. रात्री पाण्याची पातळी ४ ते ५ मीटरच्या मध्येच होती. कधीही पाणी पातळी वाढू शकते, या भितीने सर्व अधिकारी व नागरिक अर्लट होते. वेगवेगळ्या भागातील नागरिकही रात्री रस्त्यापर पाण्याची परिस्थिती बघताना आढळून आले. काही रात्री उशिरा झोपले.

सकाळी ११ वा. वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली. नाईक कंपनी, मच्छीमार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी तब्बल १ फूट पाणी भरले होते. ज्या ठिकाणी पाणी भरले होते त्या भागाकडे जाणारी वाहतूक बंद केली होती. त्यानंतर पाणीपातळी कमी होण्यास सुरवात झाली; मात्र पुन्हा १ वा. नदीतील पाण्याने इशारा पातळी ओलांडली.

चिपळूण पालिकेच्या बोटी सांस्कृतिक केंद्र, शंकरवाडी, बाजारपेठ विसर्जन घाट, बसस्थानक, पालिका कार्यालय या ५ ठिकाणी ठेवण्यात आल्या. पालिकेचे बचावपथक ९ ठिकाणी तैनात केले आहे. तलाठी, पोलिस आणि एनडीआरएफची ६ पथके तैनात केलेली आहेत.

एका पथकात ५ तलाठी, ३ पोलिस व ३ जवानांचा समावेश आहे. यातील काही पथकांबरोबर बोटी देण्यात आल्या आहेत. कुंभार्ली घाटात कोसळलेली दरड हटवण्यात आली. त्यामुळे वाहतूक सुरू आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *