शशी थरूर यांचा कॉलम:दक्षिण आशियातील अनेक देशांत वाहिले बदलाचे वारे

गेल्या पाच वर्षांत द. आशियात तरुणांच्या नेतृत्वाखाली 6 सत्ताविरोधी आंदोलने पाहायला मिळाली. या आंदोलनांनी या प्रदेशातील राजकीय चित्र मुळापासून बदलून टाकले आहे. या आंदोलनांमध्ये अनेक साम्ये होती. सर्वांमध्ये तरुणांच्या आकांक्षांची झलक होती, ती डिजिटल माध्यमातून संघटित झाली होती. शिवाय त्यात आर्थिक निराशा आणि सत्ताधारी वर्गाबद्दलचा भ्रमनिरास दिसून आला होता. मात्र, ज्या राजकीय व्यवस्थांमध्ये ही आंदोलने झाली, त्यांनी हा असंतोष वेगवेगळ्या पद्धतीने हाताळला. त्यामुळे आंदोलनांचे परिणामही वेगळे राहिले. याची सुरुवात म्यानमारमधून होते. तिथे फेब्रुवारी 2021 मध्ये लष्कराने लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून टाकले. प्रचंड निदर्शने झाली. नव्या सत्ताधाऱ्यांनी आंदोलकांवर कारवाई केली. लोकशाही स्थापनेचा मार्ग बंद झाला. त्यामुळे तरुणांसमोर ‘सिव्हिलियन डिफेन्स फोर्स’ स्थापन करणे व वांशिक सशस्त्र संघटनांसोबत मिळून लढण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उरला नाही. परिणामी, तिथे यादवी युद्ध सुरू झाले. मार्च 2022 मधील श्रीलंकेतील अरागालया आंदोलन आर्थिक दुर्दशेतून उभे राहिले. पेट्रोल पंपांवरील इंधन संपले होते. दीर्घकाळाची वीज कपात आणि आर्थिक दिवाळखोरी यामुळे राजपक्षे कुटुंबाच्या सत्तेची वैधता संपुष्टात आली. हे कुटुंब दोन दशकांपासून देशाच्या राजकारणावर वर्चस्व गाजवत होते. देशभरात निदर्शने झाली. अखेर आंदोलकांनी थेट राष्ट्रपती भवनावरच ताबा मिळवला. मात्र, श्रीलंकेत फारशी हिंसा झाली नाही. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी दबावात राजीनामा दिला. पाकिस्तानात मे 2023 मध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर दंगली उसळल्या होत्या. हे एक असे प्रकरण होते, ज्यात एका लोकप्रिय नेत्याच्या पाठीमागे जनआंदोलन उभे राहिले होते. याद्वारे लष्कराच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिले जात होते. याला उत्तर म्हणून लष्कर तैनात करण्यात आले, इंटरनेट बंद करण्यात आले आणि विरोधकांची पक्षीय रचनाच संपुष्टात आणली गेली. वाढत्या राजकीय अलिप्ततेची किंमत मोजूनही पाकिस्तानची ‘हायब्रिड’ शासन व्यवस्था वाचवली गेली. बांगलादेशात जुलै 2024 मध्ये झालेला उठाव हे एका गोष्टीचे उत्तम उदाहरण होते. एक मर्यादित धोरणात्मक वाद, सरकारी नोकऱ्यांतील कोटा व्यवस्थेविरुद्ध विद्यार्थ्यांचा विरोध जनआंदोलनात कसा बदलू शकतो, हे यातून दिसले. शेख हसीना यांच्या हुकूमशाही सरकारविरोधात आंदोलन वाढले, तेव्हा संचारबंदी लागू करण्यात आली. लष्कर तैनात झाले आणि नियम मोडणाऱ्यांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले गेले. पण, जेव्हा लष्करानेही हे आदेश पाळण्यास नकार दिला, तेव्हा हसीना यांना देश सोडून पळावे लागले आणि तिथे हंगामी सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला. नेपाळमध्ये सप्टेंबर 2025 च्या निदर्शनांचे लक्ष्य कोणता एक नेता नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्ग होता. हा वर्ग एका दशकापासून पंतप्रधानपदाच्या खुर्चीसाठी ‘म्युझिकल चेअर’ खेळत होता. दुसरीकडे, तरुण बेरोजगारी आणि संधीच्या अभावाशी झगडत होते. सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीमुळे निराश असलेली ‘जेन-झी’ पिढी भडकली. नेपाळी तरुणांनी व्हीपीएन आणि इतर ॲप्सचा वापर करत मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. सरकारने ती बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न केला. पण, आंदोलकांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. अखेर संसदीय रचना नष्ट न करता राजकीय उच्चभ्रू वर्गाला सत्तेबाहेर काढण्यात आले अन् 35 वर्षीय तरुणाला पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. तर जुलै महिन्यात भारतात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली व्यापक निदर्शने झाली. याची सुरुवात प्रवेश परीक्षांमधील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून झाली. नंतर रोजगारहीन आर्थिक वाढीबाबत वाढत्या अस्वस्थतेमुळे त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. मात्र, भारतात या आंदोलनाने घटनात्मक व्यवस्थेला धोका निर्माण करण्याऐवजी उलट तिची बळकटीच दाखवून दिली. सरकारने काही महत्त्वाच्या सवलती दिल्या, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला आणि प्रशासकीय तसेच धोरणात्मक सुधारणांचा प्रस्ताव ठेवला. जेणेकरून विरोधाची ऊर्जा पुन्हा एकदा प्रस्थापित लोकशाही मार्गांकडे वळवता येईल. हायपर-कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक-राजकीय अलिप्तता यांचा मेळ खूप ताकदवान असतो. डिजिटल जगात वाढलेली तरुण पिढी प्रस्थापित व्यवस्थांना बाजूला सारून मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र करू शकते. आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत, आजचे तरुण आंदोलक ‘आपल्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही’ या भावनेने जास्त प्रेरित आहेत. ते सरकारी सवलतींना भुलत नाहीत आणि दडपशाहीला थेट सामोरे जातात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) राजकीय व्यवस्थांनी तरुणांची आंदोलने वेगवेगळ्या पद्धतीने हाताळली. त्यामुळे या आंदोलनांचे परिणामही एकमेकांपेक्षा वेगळे राहिले. मात्र, 6 देशांपैकी भारताचा प्रतिसाद सर्वाधिक उल्लेखनीय राहिला.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *