Pune : लेह-लडाखहून परतताना अपघात; गुढीपाडव्याच्या दिवशी तिघा मित्रांवर अंत्यसंस्कार, पिंपरी शोकाकुल

Pimpri-Chinchwad : लेह लडाख येथे पर्यटनाचा आनंद लुटू घरी परत येताना राजस्थानात झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन तरुणांची पार्थिवं विमानाने गुरुवारी १९ मार्च रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये आणण्यात आली. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात तिघा मित्रांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नेमकं काय झालं?
कुणाल किरण चोरडिया (रा. चिंचवड गाव), मयुरेश पांडुरंग पाडाळे (रा. म्हाळुंगे पाडाळे, ता. मुळशी) आणि सिद्धांत रमेश आल्हाट (रा. आल्हाटवस्ती, वाकड) अशी मृत तरुणांची नावं आहेत. शहरातील काही तरुण तीन कारमधून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लेह-लडाखला गेले होते. तेथून परत येत असताना राजस्थानात कोटाजवळ मुंबई-दिल्ली महामार्गावर एका कारला अपघात झाला. यात कारमधील तिघांनाही प्राण गमवावे लागले. धक्कादायक म्हणजे प्रचंड बर्फवृष्टीमुळे कारगिल येथे सर्व तरुण आठ दिवसांपूर्वी अडकले होते. परंतु पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक नेत्यांनी ‘बीएसएफ’च्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्वांना तिथून सुरक्षित बाहेर काढले होते. यापैकी तिघांना परतीच्या प्रवासात मृत्यूने गाठल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
कुणाल चोरडिया याच्यावर काळेवाडी स्मशानभूमी, सिद्धांत आल्हाट याच्यावर वाकड गावठाणातील स्मशानभूमी आणि मयुरेश पाडाळे याच्यावर म्हाळुंगे पाडाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी या दु:खद प्रसंगाने वातावरण शोकाकुल झाले होते. तिघांचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीयांना दु:ख अनावर झाले.

नेत्यांकडूनही श्रद्धांजली
राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही फेसबुकवरुन तिघा तरुणांना श्रद्धांजली वाहिली आहे. "लडाखची स्वप्नवत सहल आनंदाने सुरू झाली… पण परतीच्या प्रवासात आलेल्या त्या भीषण अपघाताने सर्व काही एका क्षणात हिरावून नेले. पिंपरी-चिंचवडमधील सिद्धांत आल्हाट, कुणाल चोरडिया आणि मयुरेश पाडळे या तिन्ही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू ही मन सुन्न करून टाकणारी घटना आहे."

"आयुष्याच्या उंबरठ्यावर उभे असलेले हे हसरे चेहरे आज कायमचे हरवले, ही वेदना शब्दांत मांडणं अशक्य आहे. हिंदू नववर्षाच्या प्रारंभी अशी दुर्दैवी घटना समोर आल्यामुळे पिंपरी-चिंचवडवर शोककळा आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांना या असीम दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना..!" अशा भावना शेळकेंनी व्यक्त केल्या आहेत.

अपघात झालेल्या मित्रांसोबत आणखी एक तरुण होता. परंतु मंगळवारी अस्वस्थ वाटू लागल्याने तो विमानाने घरी परतला होता. जेव्हा त्याला अपघाताची माहिती समजली, तेव्हा मोठा मानसिक धक्का बसला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *