नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण

नवी दिल्ली: देशातील परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी आणि इतर प्रमुख शैक्षणिक प्रश्नांवरून आक्रमक पवित्रा घेतलेल्या अभिजीत दिपके यांच्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या संघटनेने आगामी ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत काढण्याचे ठरवलेल्या बहुचर्चित निषेध मोर्चाला आणि रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला असून, या प्रकरणी सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली आहे.

काय आहे प्रकरण आणि याचिका?

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली 'कॉकरोच जनता पार्टी'ने देशातील परीक्षांमधील कथित अनियमितता, रखडलेले निकाल आणि अश्वासनपूर्तीविरोधात ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत एका भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा इंडिया गेटपासून सुरू होऊन थेट दिल्ली पोलीस मुख्यालय (Delhi Police Headquarters) आणि संबंधित उच्चाधिकार क्षेत्रापर्यंत नेण्याचे नियोजनCJP कडून करण्यात आले आहे. दरम्यान, या नियोजित रॅलीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि वाहतूक विस्कळीत होऊ शकते, असा युक्तिवाद करत या रॅलीला किंवा आंदोलनाला प्रतिबंध करावा, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेत न्यायालयाने कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला.

सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण:

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, कोणतीही ठोस किंवा भक्कम कारण नसताना केवळ पूर्वग्रहातून किंवा अंदाज बांधून आधीच अप्रिय घटना घडतील असे गृहीत धरता येणार नाही. लोकशाही देशात नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने आपले प्रश्न मांडण्याचा आणि निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि संबंधित प्राधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी आहे आणि ते योग्य ती काळजी घेतील, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. तसेच, कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे काम पोलीस आणि प्रशासनाचे असून, त्याआधीच आंदोलनावर सरसकट बंदी घालता येणार नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

आंदोलनाची रूपरेषा व CJP ची भूमिका:

'कॉकरोच जनता पार्टी'ने जाहीर केल्यानुसार, या आगामी मोर्चाचे नेतृत्व अशा विद्यार्थ्यांचे कुटुंबीय करणार आहेत, ज्यांनी नीट (NEET) किंवा इतर महत्त्वाच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर तसेच फेरपरीक्षा व निकालातील तणावामुळे आपले प्राण गमावले होते. याशिवाय, जुलै महिन्यातील मागील आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थ्यांना कथितरित्या पोलीस कारवाई व अत्याचारांना सामोरे जावे लागले होते, त्यांच्या कुटुंबातील सदस्यही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. CJP च्या कार्यसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, "आमच्या शांततेला किंवा सद्भावनेला कुणीही कमजोरी समजण्याची चूक करू नये, तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारविरोधातील हा लढा अधिक तीव्र केला जाईल," असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *