त्या अभूतपूर्व परिस्थितीला तोंड देण्यास आम्ही कमी पडलो!" मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची विशेष सभेत प्रांजळ कबुली!

 

मुंबई: "जीवितहानी झाली की प्रशासनही अस्वस्थ होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होऊ नये, यास आमचे प्राधान्य असते. त्यासाठी आम्ही शर्थीने प्रयत्न करत असतो. मात्र, गेल्या काही दिवसांत पावसाने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. त्यास तोंड देण्यासाठी कदाचित आमची तयारी कमी पडली असावी. मात्र, यातून धडा घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणखी सक्षम करू. भविष्यात अशा अप्रिय घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ आणि मागील काही दिवसांत झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही," अशी ग्वाही मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत मुंबईत झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर चर्चा आणि उपाययोजना करण्यासाठी मुंबई महापालिका सभागृहाची एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत निवेदन करताना शर्मा बोलत होते.

'झाडे लावताना निकषांचे पालन प्राधान्याने केले जाईल' १. यंदाच्या पावसाळ्याच्या दृष्टीने आमची तयारी पूर्ण झाली होती व यंत्रणाही सक्षम होती. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय होता. मात्र, १ ते ८ जुलै या कालावधीत झालेला मुसळधार पाऊस, समुद्रात आलेल्या जास्त उंचीच्या लाटा आणि प्रतितास ७० ते ८० किमी वेगाने वाहणारे वारे, यामुळे अत्यंत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. अशा गंभीर परिस्थितीत तोंड देण्याची आमची पूर्वतयारी कदाचित कमी पडली असावी, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. २. अतिरिक्त आयुक्तांनी यावेळी झाडे कोसळणे, झाडांच्या भोवतालचे काँक्रीटीकरण, उघडे मॅनहोल आणि नालेसफाई आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर पालिकेची बाजू मांडली. ज्या झाडांच्या मुळांभोवती काँक्रीटीकरण झाले असेल, ते काढण्याची जबाबदारी आता थेट रस्ते विभागाच्या इंजिनिअरवर सोपवण्यात आली आहे. तसेच कचरा डेपो आणि सार्वजनिक उपक्रमांच्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वनीकरण केले जाईल. ३. झाडे लावताना भविष्यात सर्व निकषांचे पालन केले जाईल. चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड पडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशी अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. तर मॅनहोल उघडे राहिल्याने झालेल्या जीवितहानी प्रकरणी संबंधितांना अटक करण्यात आली असून, यासंबंधीचा सविस्तर अहवाल पुढील आठवड्यात सादर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनेक नगरसेवकांनी फिरवली पाठ शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून सुरू झालेली ही विशेष चर्चा शनिवारी मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास संपली. या संपूर्ण चर्चेच्या वेळी सर्वपक्षीय नगरसेवक मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित होते. मात्र, सर्वात शेवटी जेव्हा अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा या संपूर्ण चर्चेला अधिकृत उत्तर देण्यासाठी उभे राहिले, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंकडील अनेक नगरसेवक सभागृहातून गायब असल्याचे दिसून आले. पावसाळ्यातील गंभीर दुर्घटनांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या मुख्य बैठकीच्या उत्तरावेळीच नगरसेवक हजर नसल्याने पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होती.

मुंबईत झाडांच्या संख्येत मोठी वाढ होणार वर्ष २०१८ च्या वृक्ष गणनेनुसार मुंबईत आजच्या घडीला एकूण ३० लाख झाडे आहेत. यापैकी १० लाख ६७ हजार झाडे सरकारी जागेवर, १५ लाख ५० हजार झाडे खाजगी जागेवर, तर १ लाख ८५ हजार झाडे रस्त्यांच्या कडेला आहेत. पालिकेची नवी वृक्ष गणना लवकरच सुरू होणार असून ती २०२८ पर्यंत पूर्ण होईल. त्यावेळी मुंबईतील झाडांच्या संख्येत किमान २० टक्के वाढ होऊन एकूण संख्या ४० लाखांच्या घरात जाण्याची शक्यता शर्मा यांनी वर्तवली.

नालेसफाईच्या '१०० टक्के' शब्दप्रयोगात बदल होणार पावसाळ्यापूर्वी साधारणपणे ८० टक्के नालेसफाई केली जाते. ८० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच निर्धारित उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर '१०० टक्क्यांपेक्षा जास्त सफाई झाली', असा शब्दप्रयोग केला जातो; मात्र यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी भविष्यात या '१०० टक्के' संज्ञेत किंवा शब्दप्रयोगात बदल केला जाईल, असे विपिन शर्मा यांनी सभागृहाला सांगितले.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *