शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विनोद पाटील यांची नियुक्ती, तर संदेश केंजळे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली;

Shirur Police Station appoints Vinod Patil as Police Inspector; Sandesh Kenjale transferred to the Economic Offences Investigation Department;शिरूर (पिंपरखेड ) प्रफुल्ल बोंबे | दि. ०८ शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची पुणे येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाटील यांनी नुकताच शिरूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून त्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस प्रशासनात नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली आहे.

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी जवळपास दोन वर्षांपूर्वी शिरूर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात शिरूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच अनेक संवेदनशील प्रकरणांचा तपास प्रभावीपणे करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण तसेच अवैध धंद्यांवर कारवाई यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. नागरिकांशी संवाद वाढविण्यासाठीही विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. त्यांच्या बदलीनंतर आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी यापूर्वी मुंबईमध्ये तब्बल २८ वर्षे विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. गुन्हे तपास, प्रशासकीय कामकाज आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. वेगाने विकसित होत असलेल्या शिरूर तालुक्यातील पोलीस प्रशासनाची धुरा सांभाळताना त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शिरूर शहरासह तालुक्यातील नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विनोद पाटील यांचे स्वागत केले असून नागरिकाभिमुख आणि प्रभावी पोलीस प्रशासनाची अपेक्षा व्यक्त केली आहे. वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी आणि महामार्गावरील वाढती वाहतूक यामुळे शिरूर पोलीस ठाण्याची जबाबदारी अधिक वाढली असून नव्या पोलीस निरीक्षकांसमोर अनेक आव्हाने असणार आहेत.

दरम्यान, नव्या नेतृत्वाकडून गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा आणि सर्वसामान्य नागरिकांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभी राहील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *