Ambenali Ghat Tragedy: Scorpio Plunges 800 Feet into Deep Gorge Killing 8 Satara Youths After Beach Vacation!

महाबळेश्वरजवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ८०० फूट खोल दरीत कोसळली; साताऱ्याच्या ८ मित्रांचा जागीच मृत्यू

Ambenali Ghat Tragedy: Scorpio Plunges 800 Feet into Deep Gorge Killing 8 Satara Youths After Beach Vacation!
रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर, महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाच्या समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. पर्यटकांची एक स्कॉर्पिओ कार अनियंत्रित होऊन तब्बल ८०० ते १००० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत गाडीमधील सर्व ८ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि खटाव परिसरातील रहिवासी होते.

पर्यटनाचा आनंद ठरला शेवटचा:मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील रहिवासी असलेले हे मित्र रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि हर्णे बीच येथे पर्यटनासाठी गेले होते. दोन दिवस कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर मनसोक्त आनंद लुटल्यानंतर, हे सर्वजण आपल्या स्कॉर्पिओ गाडीने पुन्हा साताऱ्याकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, रविवारी रात्री उशिरा किंवा सोमवारी पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटातील दाभिळ गावच्या हद्दीत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट खोल दरीत कोसळली.

सततचा प्रवास आणि थकव्यामुळे चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अथक प्रयत्नांनंतर रेस्क्यू ऑपरेशन (बचावकार्य):शनिवारी-रविवारपासून तरुणांशी संपर्क होत नसल्याने घाबरलेल्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली होती. पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शोध सुरू केला असता, ही कार दरीत कोसळल्याचे समोर आले. घाटातील अतिशय अवघड मार्ग, विस्तीर्ण दरी, घनदाट जंगल आणि अंधार यामुळे सुरुवातीला बचाव कार्यात प्रचंड अडचणी येत होत्या. बचाव पथकांनी दुर्बिणीच्या साहाय्याने मृतदेहांचा आणि गाडीचा शोध घेतला.

घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाडची सिस्केप रेस्क्यू टीम आणि पोलादपूर पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. दोरखंडाच्या साहाय्याने अत्यंत कठीण अशा निसरड्या दरीत उतरून रात्रीपासून मदतकार्य राबवले जात आहे.

मृतांची नावे: प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात आसगाव येथील रितेश राजेंद्र लोखंडे (२२), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), मर्ढे येथील करण आनंद शिंगटे (२१), निखिल अभिमन्यू शिंगटे (२५), खटाव येथील चालक संदीप अशोक काटकर (३७) आणि चिपळूण येथील अंश समीर चव्हाण (१९) यांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर आणि तरुणांच्या गावांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



शहर

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *