Pune : इराणकडून भारताला इंधन पुरवठा; तुटवड्याची भीती दूर, 100 जहाजे भारताकडे रवाना,पेट्रोल असोसिएशनच्या सदस्यांची माहिती

Pune : शहरात पेट्रोल पंपांवर वाढलेली गर्दी आणि काही पंप बंद असल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर आता स्पष्टता आली आहे. पेट्रोल असोसिएशनच्या कोअर कमिटीचे सदस्य अली दारुवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही परिस्थिती तुटवड्यामुळे नसून तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे निर्माण झाली आहे. अचानक क्रेडिट विड्रॉ केल्यामुळे अनेक पेट्रोल पंप चालकांना अडचणींचा सामना करावा लागला. पेट्रोलचा तुटवडा नसून, काही पंप मालकांकडे आगाऊ इंधन खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसे नसल्यामुळेच पंप बंद ठेवावे लागले आहेत. जे पंप चालक ॲडव्हान्स पेमेंट करू शकले नाहीत, त्यांचेच पंप सध्या बंद आहेत, असं अली दारुवाला यांनी स्पष्ट केलं आहे.

“पेट्रोलचा भाव एकही रुपया वाढणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी नागरिकांना दिलासा दिला. देशात इतका मोठा साठा उपलब्ध आहे की साठवण्यासाठी जागा कमी पडेल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, लॉकडाऊनच्या भीतीमुळे नागरिक गरजेपेक्षा जास्त पेट्रोल साठवून ठेवत आहेत. एक-दोन लिटरऐवजी थेट 10 लिटर पेट्रोल घेण्याची घाई सुरू असल्याने पंपांवर अनावश्यक गर्दी होत आहे. नागरिकांनी पंपांवर गर्दी करू नये आणि जास्तीचे पेट्रोल साठवू नये", असे आवाहन त्यांनी केले आहे. "सध्या दिसणारी परिस्थिती ही केवळ अफवांमुळे निर्माण झालेली असून, प्रत्यक्षात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही", असं अली दारुवाला यांनी स्पष्ट केलं.

'१०० जहाजे भारताच्या दिशेने रवाना'
दरम्यान, "एक सकारात्मक आणि अतिशय चांगली गुडन्यूस समोर आली आहे. आज दुपारी साडेबारा वाजता इराणचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे परराष्ट्र मंत्री यांच्यात बैठक झाली. त्यानंतर इराणने भारतासह जगातील पाच देशांना इंधन वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. भारताकडे निघालेले सर्व टँकर्स पुढील ८ ते ९ दिवसांत सुरक्षितपणे पोहोचणार आहेत. भारताला पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी आणि एलएनजीचा पुरवठा करण्यासाठी जवळपास १०० जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. पुढील ९ ते १० दिवसांत हा पुरवठा देशात पोहोचणार आहे", अशी माहिती अली दारुवाला यांनी दिली.

'परिस्थिती सुरळीत होणार'
याशिवाय, "सरकारला इंधनावर लिटरमागे सुमारे ५० रुपयांचा फटका बसत असल्याने सध्या ॲडव्हान्स पेमेंट घेऊनच इंधन पुरवठा केला जात आहे. तसेच पीएनजी पाइपलाईनचे रखडलेले कामही उद्यापासून पूर्ण होणार आहे. एकूणच, भारतात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, पुढील १० ते १२ दिवसांत परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा", असे आवाहन अली दारुवाला यांनी केले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *