पुणे: केसनंदच्या शाश्वत रुग्णालयात प्रसूतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांचा संताप

पुणे: उरुळी कांचन येथील केसनंद गावातील 'शाश्वत रुग्णालयात' प्रसूतीदरम्यान कथित वैद्यकीय हलगर्जीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने डॉक्टरांवर गंभीर आरोप करत
कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

पीडित महिला, दिपाली राकेश मोझे (रा. केसनंद), गेल्या सात महिन्यांपासून याच रुग्णालयात गर्भधारणेचे उपचार घेत होत्या. २१ जून रोजी पहाटे त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी पाण्याची
पिशवी फुटल्यानंतरही नैसर्गिक प्रसूतीचा प्रयत्न करण्यात आला. वेदना असह्य झाल्यामुळे महिलेने वारंवार सिझेरियन शस्त्रक्रियेची विनंती केली होती, मात्र त्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या विलंबामुळे महिलेला अतिरक्तस्राव झाला आणि प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर तातडीने दुसऱ्या डॉक्टरांना बोलावून सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र बाळ निपचित होते. बाळाला तातडीने पुण्यातील एमजेएम रुग्णालयात हलवण्यात आले,
परंतु तिथे उपचार सुरू असतानाच नवजात बालकाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर नातेवाईकांनी जाब विचारण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली असता त्यांच्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दुसरीकडे, रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
"आम्ही तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून सर्व नियमांचे पालन करून उपचार केले आहेत.
शस्त्रक्रियेपूर्वी नातेवाईकांना परिस्थितीची कल्पना देऊन त्यांच्या सह्याही घेतल्या होत्या," असे डॉ. खरात (शाश्वत रुग्णालय) यांनी स्पष्ट केले आहे. सध्या वाघोली पोलिसांनी
या प्रकरणाची अदखलपात्र नोंद केली असून पीडित कुटुंबाला न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *