Mumbai : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, दहा पदरीकरणावर वाहतूककोंडी कमी, पण टोल वसुली कालावधी वाढणार

Pune : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढत्या वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. विशेषतः वीकेंडला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. काही महिन्यांपूर्वी टँकर उलटल्याने तब्बल 32 तासांची कोंडी झाल्याची घटना अजूनही ताजी आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रशासनाने आता निर्णय घेतला असून येत्या पावसाळ्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे दहा पदरीकरणाचे काम सुरू होणार आहे.

टोल वसुलीचा कालावधी वाढणार

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडून 94.6 किमी लांबीच्या या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प 2026 मध्ये सुरू होऊन 2029-30 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

या प्रकल्पासाठी निधी उभारण्यासाठी टोल वसुलीचा कालावधी 15 वर्षांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. सध्या 2045 पर्यंत असलेली मुदत 2060 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तरतूद नसल्याने MSRDC ला स्वतंत्रपणे निधी उभा करावा लागणार आहे.

MSRDCचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी सांगितले की, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम टप्प्याटप्प्याने केले जाईल.

‘मिसिंग लिंक’मुळे नवा पर्याय

या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 14,260 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या या महामार्गावर दररोज सुमारे 65,000 वाहने धावतात, तर वीकेंडला ही संख्या एक लाखाच्या पुढे जाते. दरवर्षी 5 ते 6 टक्क्यांनी वाहतूक वाढत आहे.

येत्या मे महिन्यात 13 किमी लांबीचा ‘मिसिंग लिंक’ मार्ग सुरू होणार आहे. हा 10 पदरी मार्ग खंडाळा घाटातून जाणार असून प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणार आहे. मात्र, वाढत्या वाहनसंख्येमुळे मुख्य महामार्गाचे रुंदीकरण आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

2002 पासून सेवेत असलेला महामार्ग

नवी मुंबईतील कळंबोलीपासून सुरू होणारा हा महामार्ग पुण्यातील किवळेपर्यंत जातो. 2002 साली हा द्रुतगती महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *