छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: खेळण्या-बागडण्याच्या, निष्पापपणे हसण्या- खिदळण्याच्या आणि आई-वडिलांच्या कुशीत वाढण्याच्या कोवळ्या वयात काळाने एकाच घरातील दोन चिमुकल्या जीवांना अत्यंत निघृणपणे हिरावून नेले आहे. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील हसत्या-खेळत्या थोटे कुटुंबावर नियतीने असा क्रूर आघात केला आहे की, ज्यामुळे संपूर्ण गावासह परिसराचे काळीज पिळवटून निघाले आहे. मंगळवारी रात्री कुटुंबाने अत्यंत प्रेमाने एकत्र खाल्लेली खिचडी या परिवारासाठी अक्षरशः काळरात्र ठरली. या अन्नातून झालेल्या विषबाधेने आधी दोन वर्षांचा लाडका चिमुकला आयुष आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी अवघ्या सहा वर्षांची बहीण गायत्री या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. सलग दोन दिवसांत आपल्या पोटच्या दोन्ही निष्पाप गोळ्यांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी आणि अमानुष वेळ एका हतबल पित्यावर ओढवली.


खिचडी खाल्ली अन् पहाटेपासून त्रासाला सुरुवात
चिंचोली लिंबाजी येथील रहिवासी नारायण साहेबराव थोटे (वय ३५) यांच्या घरात मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे चुलीवर स्वयंपाक झाला. पत्नी देवशाला (वय ३०), मुलगी गायत्री (वय ६ ते ७ वर्षे) आणि मुलगा आयुष (वय २ वर्षे) या चौघांनी एकत्र बसून रात्रीची खिचडी खाल्ली. मात्र, बुधवारी पहाटेपासूनच घरातील चारही सदस्यांना अचानक तीव्र उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला कुटुंबीयांनी स्थानिक पातळीवर प्राथमिक औषधोपचार घेतले. मात्र, गुरुवारी पहाटे परिस्थिती हाताबाहेर गेली आणि दोन्ही लहान मुलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली.


सिल्लोडला नेताना आयुषने प्राण सोडले; पित्याचा हंबरडा
गुरुवारी पहाटे आयुष आणि गायत्री यांना गावातील खासगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना तातडीने सिल्लोड येथे हलवण्याचा सल्ला दिला. परंतु दुर्दैवाने, सिल्लोडकडे घेऊन जात असताना वाटेतच गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अवघ्या दोन वर्षांच्या आयुषची प्राणज्योत मालवली. ज्या चिमुकल्याच्या हातावर खेळणी खेळायची वेळ होती, त्याच्या निष्पाप पार्थिवाला जड अंतःकरणाने गुरुवारी दुपारी १२ वाजता अग्नी देण्याची वेळ हतबल पिता नारायण थोटे यांच्यावर आली.


दुसऱ्या दिवशी लेकीनेही सोडले प्राण; गावात शोककळा
एका मुलाला अग्नी दिल्यानंतर अश्रू कोरडे होत नाहीत तोच नियतीने थोटे कुटुंबावर दुसरा आघात केला. मृत्यूशी झुंज देणाऱ्या लाडक्या गायत्रीला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले, परंतु शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तिचीही प्राणज्योत मालवली. एकापाठोपाठ दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने आई, वडील आणि आजीने फोडलेल्या हंबरड्याने स्मशानभूमीतील प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले. आई-वडिलांची प्रकृती उपचारांनंतर धोक्याबाहेर आली असली, तरी घरातले हसते-खेळते जगच उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण चिंचोली लिंबाजी गावावर शोककळा पसरली आहे.


फॉरेन्सिक व अन्नसुरक्षा पथकाकडून नमुने जप्त
या गंभीर घटनेची माहिती मिळताच अन्नसुरक्षा अधिकारी एम. एल. सिद्दीकी, पिशोर पोलीस ठाण्याचे पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घरात तयार करण्यात आलेल्या अन्नाचे, धान्याचे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे डेंग्यूमुळे १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. आता अन्नातील विषबाधेने दोन बालकांचा बळी गेल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *