बुलढाणा: कर्जाचा डोंगर अन् सततच्या नापिकीला कंटाळून पिता-पुत्रानं टोकाचं पाऊल उचललं; राबत्या शेतातच गळ्याला दोर लावत जीवन संपवलं;

बुलढाणा: एक अत्यंत सुन्न करणारी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीमुळे खचलेल्या एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, वडिलांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर दुःखावर नियंत्रण न ठेवता ३० वर्षीय तरुण मुलानेही मित्राला फोन करून काही वेळातच त्याच शेतात स्वतःला गळफास लावून जीवन संपवले. या एकाच कुटुंबातील पिता-पुत्राच्या दुहेरी आत्महत्येने खामगाव तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील पारखेड येथील रहिवासी असलेले संतोष हरिश्चंद्र गावंडे (वय ५०) हे जळका भडंग गावांनजिक असलेल्या आपल्या शेतात गेले होते. शेतात गेल्यावर त्यांनी कांद्याच्या चाळीच्या लोखंडी चौकटीला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, रात्र झाली तरी वडील घरी परत न आल्यामुळे त्यांचा ३० वर्षीय मुलगा अक्षय संतोष गावंडे हा वडिलांचा शोध घेण्यासाठी शेतात पोहोचला.

जेव्हा अक्षयने शेतात वडिलांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिला, तेव्हा त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला. या हृदयद्रावक दृश्याने तो पूर्णपणे कोलमडून गेला. त्याने ताबडतोब आपल्या एका मित्राला फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि त्यानंतर काही वेळातच त्यानेही त्याच शेतात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये एकच शोककळा पसरली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह खाली उतरवले आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. शेतीवरील वाढलेला कर्जाचा डोंगर आणि पिकांचे झालेले वारंवार नुकसान यामुळे या कुटुंबावर हा मोठा आघात ओढवला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *