आरती जेरथ यांचा कॉलम:जगात देशाची चांगली प्रतिमा निर्माण करणे हे आपले कर्तव्य

कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय पर्यटकांविषयी सर्च करून पाहा, परदेश दौऱ्यावरील त्यांच्या वागणुकीचे किंवा गैरवर्तनाचे अनेक व्हिडिओ समोर येतील. एक गट चीनच्या भिंतीवर उत्सवी पोशाख घालून गरबा खेळत आहे. दुसरा गट व्हिएतनाममधील हनोईच्या प्रसिद्ध ट्रेन स्ट्रीटवर शाहरुख खानच्या ‘छैंया छैंया’ गाण्यावर नाचत आहे. एक गट व्हिएतनाममधीलच एका विमानतळावर रनवेजवळील रस्त्यावर डान्स करत आहे, ज्यामुळे तेथील सुरक्षा कर्मचारी वैतागलेले दिसतात. तर दुसरा एक गट, अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या सीमेवर असलेल्या इग्वाझू फॉल्सवर बोट सफारी करताना ‘इंडिया, इंडिया’च्या घोषणा देत आहे. याआधी याच लोकांनी बोटीत चढताना रांग मोडण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्कीही केली होती. पॅरिस, लंडन, बँकॉक ते बालीपर्यंत अशी अनेक उदाहरणे तुम्हाला पाहायला मिळतील. क्वचितच असे एखादे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ उरले असेल, जिथे भारतीय पर्यटकांनी व्यवस्थेत व्यत्यय आणला नसेल. एक काळ असा होता, जेव्हा परदेशातील त्यांच्या उद्धट वागणुकीमुळे अमेरिकन पर्यटकांना ‘द अग्ली अमेरिकन’ म्हटले जाऊ लागले होते. असे दिसते की भारतीयांवरही तसाच शिक्का बसणार आहे, सर्वच भारतीय पर्यटक असे गैरवर्तन करतात असे म्हणणे योग्य ठरणार नाही. खरे तर प्रवास-शिष्टाचाराच्या उल्लंघनाबाबत सोशल मीडियावर जी नाराजी दिसून येते, ती बहुतांश भारतीयच व्यक्त करतात. कारण त्यांना भीती असते की मूठभर लोकांच्या बिघडलेल्या वागणुकीमुळे देशविदेशात भारताची प्रतिमा मलिन होत आहे. पण त्यांनी चिंता व्यक्त करूनही भारतीय पर्यटकांविषयी अशा कहाण्या समोर येतच राहतात की ते किमतींवरून उग्र होऊन घासाघीस करतात, वेटर आणि दुकानदारांशी उद्धटपणे बोलतात. इतकेच नाही तर हॉटेलातून साबण, टॉवेल आदी वस्तूही चोरून आणतात. अलीकडेच उद्योगपती हर्ष गोएंका यांनी ‘एक्स’वर स्वतःसोबत घडलेल्या अशाच एका लाजिरवाण्या घटनेचा उल्लेख करत लिहिले की, अशा वागणुकीमुळे ‘ब्रँड इंडिया’ला कशी नामुष्की सहन करावी लागते. त्यांनी सांगितले की, स्वित्झर्लंडमधील ग्स्टाड या पर्यटन स्थळावरील एका हॉटेलमध्ये भारतीय पर्यटकांसाठी असलेल्या विशेष नियमांची यादी पाहून त्यांना धक्काच बसला. हॉटेलच्या प्रत्येक खोलीत लावलेल्या नोटीसमध्ये भारतीयांसाठी इशारा होता की त्यांनी मोफत ब्रेकफास्ट बुफेमधून अन्न बाहेर नेऊ नये. फक्त पुरवण्यात आलेली कटलरीच वापरावी आणि बाल्कनी तसेच कॉरिडॉरमध्ये गोंधळ घालू नये. त्यांनी आणखी एका घटनेचा उल्लेख केला की, एक भारतीय व्यावसायिक एका वर्षी दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीला गेले आणि रेस्टॉरंटमध्ये इतक्या मोठ्या आवाजात पंजाबी संगीत वाजवू लागले की संपूर्ण शहराला ऐकू जाईल. ते याला भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’चे प्रदर्शन म्हणत होते. खरी गोष्ट ही आहे की, देशात राहून सामाजिक शिष्टाचाराचा जो अभाव आपण दाखवतो, तो आता परदेशातही दिसू लागला आहे. दररोज आपण पाहतो की विमाने आणि रेस्टॉरंट्समध्ये मुलांना उड्या मारण्याची आणि गोंधळ घालण्याची मोकळीक दिली जाते. पालक इतरांना होणाऱ्या त्रासापासून अनभिज्ञ राहून बसलेले असतात. लोक रस्त्यावर चॉकलेटचे रॅपर आणि चिप्सची रिकामी पाकिटे फेकून देतात. सोमवारी एखाद्या सार्वजनिक उद्यानात जा, जिथे कुटुंबांनी रविवारी पिकनिक साजरी केलेली असते. तिथे कचराकुंड्या असूनही जागोजागी कागदी प्लेट्स, ग्लास आणि खरकटे अन्न विखुरलेले असते. अनेक देशांमध्ये, विशेषतः विकसित देशांमध्ये, मूलभूत नागरी भान शालेय स्तरावरूनच शिकवले जाते आणि घरात त्याचे पालन करवून घेतले जाते. परंतु असे वाटते की, कदाचित आपण चांगले नागरिक बनण्याचे महत्त्वच विसरलो आहोत. नकोशा पर्यटकांना चाळणी लावण्यासाठी थायलंडने आपल्या व्हिसा धोरणात बदल केला आहे. त्यांनी 93 देशांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश समाप्त केला आहे आणि त्यात भारताचाही समावेश आहे, भारतातून सर्वाधिक पर्यटक थायलंडला जातात. अशा स्थितीत स्वतःची आणि आपल्या देशाची चांगली प्रतिमा सादर करणे आपले कर्तव्य बनते. अखेर, पर्यटकही मुत्सद्दी अधिकाऱ्यांप्रमाणेच भारताचे प्रतिनिधी असतात. (हे लेखिकेचे स्वतःचे विचार आहेत) पर्यटक परदेशात भारताचे प्रतिनिधी असतातआज भारतीयांची जागतिक उपस्थिती वाढली आहे. आपल्या पर्यटकांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाते. अशा परिस्थितीत देशाची उत्तम प्रतिमा सादर करणे हे आपले कर्तव्य आहे. पर्यटकही मुत्सद्दी अधिकाऱ्यांप्रमाणेच भारताचे प्रतिनिधी असतात.

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *