राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!

जयपूर: बायकोने अनावश्यक खर्च करु नये किंवा चोरांना सापडू नये, यासाठी राजस्थानमधील एका शेतकऱ्याने पाच लाख रुपयांची रोख रक्कम शेतात पुरुन ठेवली होती. मात्र रोकड नेमकी कुठे ठेवली होती, हे विसरल्यामुळे त्या शेतकऱ्याला मोठी कसरत करावी लागली. अखेर ती रक्कम सापडली खरी, पण तोपर्यंत वाळवीने ५०० रुपयांच्या नोटांचा अक्षरशः चुराडा केला होता.


ही घटना राजस्थानमधील बालोत्रा जिल्ह्यातील नेवाई गावात घडली. मांगीलाल मेघवाल असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी पचपदरा येथे जमिनीचा एक भूखंड विकला होता. त्यातून त्याला ५ लाख रुपये मिळाले होते.


शेतात खड्डा खणून नोटा पुरल्या मांगीलाल यांना या पैशातून आपल्या शेतजमिनीवर एक पक्की खोली बांधायची होती. पैसे चोरीला जातील किंवा अनावश्यक खर्च होतील या भीतीने त्यांनी ती रक्कम एका पॉलिथिन पिशवीत भरली आणि शेतात खड्डा खणून ती पुरून ठेवली. मात्र, मांगीलाल यांना मद्यपानाचे व्यसन होते, आणि विसरभोळेपणा सवय. त्यामुळे पैसे नेमके कुठे लपवले होते हे ते विसरले.
नोटा पुरल्याची जागा विसरला पैशांची गरज भासली तेव्हा त्यांनी ते शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ती जागा आठवत नव्हती. ते आपल्या कुटुंबासह शेतजमिनीवरच असलेल्या एका तात्पुरत्या घरात राहतात.


पैसे न सापडल्यामुळे अखेर मांगीलाल यांनी आपल्या पत्नीला आणि मुलांना लपवलेल्या पैशांबद्दल सांगितले. सुरुवातीला कुटुंबाचा यावर विश्वास बसला नाही, पण नंतर त्यांनी पैसे शोधण्यासाठी शेताच्या विविध भागांत खणायला सुरुवात केली. त्यांचा हा शोधही निष्फळ ठरला.
वर्षभरानंतर भिजलेली पिशवी वर आली पैसे पुरल्यानंतर सुमारे वर्षभरानंतर पाऊस पडल्यामुळे कुटुंब शेतात पेरणीची तयारी करु लागले. एका रात्री पैसे असलेली ती पॉलिथिन पिशवी अचानक जमिनीतून वर आली; मात्र अंधारामुळे ती कोणाच्याही लक्षात आली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी मांगीलाल यांची पत्नी आणि मुलगा शेताभोवतीचे कुंपण दुरुस्त करत असताना त्यांना ती पिशवी दिसली. त्यांनी ती पिशवी उघडली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. पिशवीत ५०० रुपयांच्या नोटा होत्या, पण वाळवीने त्यांचं प्रचंड नुकसान केलं होतं आणि नोटांचे तुकडे झाले होते.


बँकेत गेल्यावर निराशा पदरी
काहीतरी मूल्य वसूल होईल या आशेने कुटुंबाने त्या खराब झालेल्या नोटा गोळा केल्या आणि पचपदरा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत नेल्या. मात्र नोटांच्या खराब स्थितीमुळे बँकेने त्या स्वीकारण्यास नकार दिला.
त्यानंतर हे कुटुंब बालोत्रा येथील एसबीआयच्या मुख्य शाखेत गेले पण तिथेही त्यांना परत पाठवण्यात आले. आपल्या कुटुंबाची बचत सुरक्षित ठेवण्यासाठी मांगीलालने जी रक्कम जमिनीखाली गाडून ठेवली होती, ती वर्षभर तिथे राहिल्यामुळे खराब नोटांचा केवळ एक ढिगारा उरला.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *