Pune–Mumbai Trains : सकाळी साडेनऊ नंतर थेट ट्रेन नाही; पुणे-मुंबई प्रवाशांचे हाल, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेची प्रतीक्षा कायम

Pune : गेल्या अनेक वर्षांपासून फक्त चर्चेत असणारा पुणे ते मुंबईदरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रश्न कायम आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये घोषणादेखील झाली. परंतु त्याचे काम कधी सुरू होणार असा प्रश्न आहे. या दोन मार्गिका सुरू झाल्यास मार्गावरील गाड्यांची संख्यादेखील वाढवता येईल; तसेच लोकल गाड्यांनादेखील त्याचा फायदा होऊ शकतो. रेल्वे गाड्यांची संख्या वाढवल्यास रस्ते वाहतुकीवरील ताणसुद्धा कमी होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

सहा तास रेल्वे गाड्याच नाही
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सकाळच्या प्रमुख रेल्वेगाड्या सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच उपलब्ध असून, त्यानंतर तब्बल सहा तासांचा खंड पडत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवस बाहेरून येणाऱ्या गाड्या असल्या, तरी त्या फुल्ल असतात. वाढती प्रवासी संख्या आणि कार्यालयीन ये-जा लक्षात घेता सकाळी साडेनऊनंतर किमान दर तासाला एक गाडी सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटना व नियमित प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

ZP Election : जिल्हा परिषदेसाठी शांततेत मतदान; ‘मिनी मंत्रालय’च्या कारभाऱ्यांचे भवितव्य मतदानयंत्रात कैद, निकाल सोमवारी

एसटी बसलाही प्रचंड गर्दी
पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसलादेखील कायम गर्दी असते. व्यवसाय, नोकरी, सरकारी कामासाठी मुंबईला जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी सकाळच्या टप्प्यात सिंहगड एक्सप्रेस (६:०५), डेक्कन क्वीन (७:१५), प्रगती एक्सप्रेस (७:४५) आणि वंदे भारत एक्स्प्रेस (९:२०) या प्रमुख गाड्या उपलब्ध आहेत. त्यानंतर पुण्यातून सुटणारी एकही गाडी दुपारी सव्वातीनपर्यंत नाही. बाहेरून येणाऱ्या काही विशेष गाड्या आहेत; पण त्यांना कायम गर्दी असल्यामुळे तिकीट मिळत नाही. दुपारनंतर डेक्कन एक्सप्रेस (३:१५), इंटरसिटी एक्सप्रेस (५:५०) आणि इंद्रायणी एक्सप्रेस (६:३५) या गाड्या आहेत. काही लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यातून जात असल्या, तरी त्यांच्या वेळा मध्यरात्र किंवा पहाटेच्या असल्याने त्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत नाहीत.

पुण्यातून सकाळी साडेनऊ ते सव्वातीन असे सहा तास मुंबईसाठी गाड्याच नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होते. त्यामुळे प्रवाशांना एसटी अथवा खासगी कॅबचाच पर्याय राहतो. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान खासगी व्यवसायिकांची संख्या मोठी असल्याचे दिसते. या गाड्या ‘एक्स्प्रेस वे’वरून धावत असल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्यादेखील वाढते. त्यामुळे साडेनऊनंतर किमान एक ते दोन तासांनी मुंबईसाठी रेल्वे गाड्यांची आवश्यकता आहे. पुणे-मुंबईदरम्यानचा प्रवास साधारण तीन ते चार तासांचा असून, हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग मानला जातो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त इंटरसिटी अथवा विशेष गाड्या सुरू करून वेळापत्रकातील दरी भरून काढावी, अशी मागणी होत आहे. यामुळे प्रवास अधिक सुलभ, वेळेवर आणि सुरक्षित होईल, असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “Pune–Mumbai Trains : सकाळी साडेनऊ नंतर थेट ट्रेन नाही; पुणे-मुंबई प्रवाशांचे हाल, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेची प्रतीक्षा कायम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *