Pune : बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, ६ उमेदवारांची माघार; नेमकं काय घडतंय?

Pune : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपली भूमिका ठाम करत उमेदवाराच्या माध्यमातून थेट लढतीचे संकेत दिले आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्या भोवती ही निवडणूक केंद्रीत होत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या ५३ वरून ४७ वर आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यापूर्वी 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले होते. मात्र, आज विलास बाबुराव होळकर, माऊली जमादार कांबळे, रझाक उर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी, राहुल बाळासो थोरात, अमोल यशवंत कोकरे आणि अशोक रामचंद्र खामगळ यांनी आपले अर्ज मागे घेतले. हे सर्व उमेदवार अपक्ष असल्याची माहिती आहे. उर्वरित उमेदवारांमध्येही काही जण माघार घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अंतिम लढतीचे स्पष्ट चित्र उद्या दुपारपर्यंत समोर येण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या उमेदवारामार्फत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात थेट सामना उभा राहण्याची चिन्हे आहेत. बारामतीसारख्या पारंपरिक बालेकिल्ल्यात सुनेत्रा पवार विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार असल्याने ही लढत अधिकच प्रतिष्ठेची बनली आहे. काँग्रेसच्या वतीने सुनेत्रा पवार यांच्यासमोर आव्हान उभे केलेले उमेदवार आकाश मोरे हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात 4013 मते मिळवली होती. त्यानंतर मात्र काँग्रेस बारामतीमध्ये कुठेच दिसली नाही.

12 वर्षाच्या काळानंतर पुन्हा एकदा काँग्रेस या निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीमध्ये आपली ताकद आजमावत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसची संघटनात्मक ताकद कितपत प्रभावी ठरते, याकडेही लक्ष लागले आहे. सुरुवातीला बिनविरोध निवडणुकीची शक्यता वर्तवली जात असली तरी आता ती पूर्णतः मावळली आहे. बारामतीत चुरशीची आणि बहुपक्षीय लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *