Pune : पुण्यातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम बदलणार? भवानी पेठेतील व्यापारी व नागरिकांची भावनिक साद

Pune : चैत्र वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी संस्थानची महत्त्वाची बैठक पार पडली असून आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन निश्चित करण्यात आले आहे. राज्यभरातील वारकरी आणि भाविक ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात, त्या पालखीचे यंदा ८ जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

दरम्यान, पालखीच्या पुण्यातील मुक्कामाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. पारंपरिकरित्या १८ दिवसांच्या या प्रवासात पुण्यात दोन दिवस मुक्काम असतो. मात्र, यंदा दिंडी समाजाच्या बैठकीत काही अडचणी मांडण्यात आल्या. गेल्या वर्षी भवानी पेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने अनेक दिंड्यांना पालखीपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. यामुळे मुक्कामाची जागा बदलण्याची मागणी पुढे आली.

या पार्श्वभूमीवर भवानी पेठेऐवजी वडकी नाला  येथे मुक्काम ठेवण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. मात्र, या निर्णयाला स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वारकरी संप्रदायाकडून विरोध होत आहे.

भवानी पेठ व्यापारी मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचवडे आणि केदारेश्वर विठ्ठल मंदिर (गणेश पेठ) येथील गोपी घोरपडे यांनी याबाबत पत्र देत निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा भवानी पेठेतच पार पडतो आणि संपूर्ण पुणे शहर या दोन दिवसांत भक्तीमय वातावरणात रंगून जाते.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, पालखी मुक्कामाच्या काळात सर्व समाजघटक—युवक, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्था, मंडळे आणि सर्व धर्मीय नागरिक—भक्तिभावाने सेवा करतात. तसेच संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या जवळ असल्याने भाविकांना दर्शन सोपे होते.

मुक्काम स्थलांतराच्या चर्चेमुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली असून “हा ऐतिहासिक व भावनिक सोहळा बदलू नये” अशी कळकळीची विनंती करण्यात आली आहे. गरज असल्यास सोहळ्याचा कालावधी वाढवावा, मात्र पुण्यातील पारंपरिक कार्यक्रमात बदल करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सध्या या मुद्द्यावर अंतिम निर्णय काय होणार, याकडे वारकरी आणि पुणेकरांचे लक्ष लागले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *