मुंबई: 'ट्रॅफिकचा त्रास' सांगत उपमहापौरांची दक्षिण मुंबईत बंगल्याची मागणी; पत्रामुळे रंगली नवी चर्चा

मुंबई: मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीचा त्रास आणि त्यातून होणारा मानसिक व शारीरिक ताण यांचा दाखला देत मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी दक्षिण मुंबईत शासकीय बंगला उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवले असून, या मागणीची राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमहापौर संजय घाडी हे दहिसर येथून दररोज दक्षिण मुंबईतील पालिका मुख्यालयात कामासाठी ये-जा करतात. दररोजच्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वेळेचा मोठा अपव्यय होत असून, मानसिक तणाव आणि शारीरिक थकवा जाणवत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

या समस्येमुळे नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर परिणाम होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई परिसरात अधिकृत शासकीय निवासस्थान उपलब्ध करून दिल्यास प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे करता येईल आणि नागरिकांना अधिक वेळ देता येईल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, उपमहापौरांच्या या मागणीवर विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी मुंबईतील वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या असल्याचे मान्य केले आहे, तर काहींनी लोकप्रतिनिधींनी अशा सुविधा मागण्याऐवजी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी भूमिका व्यक्त केली आहे. या मागणीवर महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *