एन. रघुरामन यांचा कॉलम:वडील तुमचे चांगले मित्र नेमके कधी बनतात?

लहानपणी मी कधीच वडील बसण्याच्या आधी बसत नसे. त्यामुळे त्या दिवशी ते माझ्यानंतर बसले, तेव्हा ते मला काहीसे विचित्र वाटले. पण दुसरा पर्याय नव्हता. माझी पहिली कार – सेकंड-हँड फियाट – पार्किंगमधून काढून त्यांच्यापर्यंत आणायची होती. त्यांनी कारच्या छतावर हात ठेवला. जणू तिला आशीर्वादच देत होते. माझ्या बहिणीने पुढच्या सीटचे दार उघडले. त्यांना माझ्या शेजारी बसवले. त्यांचा हात धरावा म्हणून मी पुढे झालो. तो अनुभव पूर्णपणे वेगळा होता. माझ्या संपूर्ण बालपणात त्यांनीच माझा हात धरला होता. माझी लहान बोटे त्यांच्या रुंद तळहाताला घट्ट पकडून असत. पण त्या दिवशी त्यांच्या बोटांना माझ्याकडून आधाराची गरज होती. आम्ही दोन वेगळ्या काळात जन्मलो होतो. त्यांचा जन्म 1927 मध्ये स्वातंत्र्यपूर्व भारतात झाला होता तर मी स्वातंत्र्योत्तर पिढीतील होतो. तरी त्या दुपारी आम्ही दोघेही एकमेकांच्या शेजारी समानतेने बसलो होतो. मुंबईच्या उपनगरांतून जाताना आम्ही दोघेही खिडकीबाहेरचे आणि विंडशील्डमधून दिसणारे जग न्याहाळत होतो. कधी-कधी ते माझ्याकडे वळून पाहत व माझी नजर त्यांच्याशी मिळण्याची वाट पाहत. वाहतूक मंदावल्यावर आमच्या नजरा जुळल्या व मला अचानक बालपणीचा तो रोमांचक क्षण आठवला. तेव्हा मी त्यांच्या सायकलीच्या पुढील दांड्यावर बसत असे. त्या वेळी मागे सरकणारे रस्ते, झाडे व दुकाने पाहणे म्हणजे जणू काही जादूच वाटत असे. आता तीच आनंदाची भावना मला त्यांच्या डोळ्यांत दिसत होती. घरी पोहोचलो आणि मी इंजिन बंद केले. त्यांच्या बाजूचे दार उघडण्यासाठी पुढे सरकलो, तेवढ्यात त्यांनी माझा हात धरला. ‘आपण थोडा वेळ इथेच बसून गप्पा मारू शकतो का?’ त्यांनी विचारले. मी थक्क झालो. आमच्या घरी त्यांचेच अंतिम मत असे. पण त्या दिवशी ते केवळ संवाद साधू इच्छित नव्हते, तर त्यासाठी माझी परवानगीही मागत होते. ‘का नाही?’ मी उत्तर दिले. मी कर्ज न घेता कार कशी विकत घेतली, याची चौकशी केल्यानंतर ते हळूच म्हणाले, ‘तुला काही आर्थिक मदतीची गरज आहे का?’ मी ‘नाही’ असे म्हणताच त्यांनी माझ्या डोळ्यांत खोलवर पाहिले आणि मंद आवाजात म्हणाले, ‘मला माफ कर. सेकंड-हँड सायकलपेक्षा जास्त काही मी तुला घेऊन देऊ शकलो नाही.’ त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आणि माझ्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आम्ही जवळपास पंधरा मिनिटे कारमध्येच बसलो. त्यांनी रेल्वेतील साध्या नोकरीबद्दल व आयुष्यात कधीही कर्ज न घेण्याच्या आपल्या ठाम तत्त्वाबद्दल सांगितले. ते म्हणाले, उत्पन्नाच्या मर्यादेत राहून जगल्यामुळे आपण नेहमी अभिमानाने मान उंच ठेवून रस्त्यावर चालू शकलो. दीर्घ सेवाकाळात निवृत्तीच्या वेळी सुट्ट्यांचे पैसे मिळावेत आणि माझ्यावर आर्थिक भार पडू नये म्हणून त्यांनी क्वचितच रजा घेतली होती. त्या दिवशी मला उमगले की आई-वडील व मुलांचे नाते स्थिर नसते; ते सतत बदलत राहते आणि अनेकदा अत्यंत सुंदर रूप धारण करते. स्वतः एका मुलीचा पिता झाल्यानंतर मी त्यांचा प्रवास अधिक चांगल्या प्रकारे समजू शकलो. आमच्यात मतभेद होते. त्यांच्या काही विचित्र सवयीही होत्या. पण त्यांनी त्यांच्या परीने सर्वोत्तम प्रयत्न केले होते, याची जाणीव झाली. चाळिशीनंतर मला हे समजू लागले की आपल्या पालकांचे स्वतःचे बालपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असते. पालकत्व ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्याचा परिपूर्ण अर्थ कुणालाच पूर्णपणे उमगत नाही. बहुतेक वडील आपल्या कमतरता आणि संघर्ष मुलांशी मित्राप्रमाणे शेअर करतात. आपली मुले कुटुंबातील मूल्ये जपत आयुष्यात यशस्वी होत आहेत, हे लक्षात आल्यानंतरच ते संवाद साधतात. मी आणि माझे वडील विवाह, आरोग्य, पैसा, भू-राजकारण आणि असुरक्षितता अशा अनेक विषयांवर मोकळेपणाने बोलत असू. आमच्यात एक समान धागा होता – समर्पण. ते नेहमी आपल्या कुटुंबासाठी व कामासाठी पूर्णपणे समर्पित राहिले. ते स्थिर, कष्टाळू, खंबीर व वचनबद्ध अशा खडकासारखे उभे राहिले आणि त्यांनी माझ्यामध्येही तेच गुण पाहिले. फंडा असा की... वडील मुलाचे सर्वात चांगले मित्र असतात. त्यांना आपल्या मुलावर कुटुंबाची परंपरा, मूल्ये व जबाबदारी सोपवण्याइतका आत्मविश्वास वाटू लागतो, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने त्याचे जिवलग मित्र बनतात.


महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *