ज्यां द्रेज़ यांचा कॉलम:इतिहासात ज्यांची नावे नाहीत, त्यांच्यातील नायक शोधावेत

आपण अनेकदा चे ग्वेरा आणि महात्मा गांधींसारख्या नायकांची प्रशंसा करतो. त्यांनी स्वतःचे आरामदायी आयुष्य सोडून इतरांच्या भल्यासाठी काम केले. मात्र, असे लोकही नायक असतात, जे स्वतः गरिबीत राहूनही इतरांची काळजी करतात आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. असे लोक मला खूप भेटले आहेत. मजूर, रिक्षावाले, आरोग्य कर्मचारी आणि इतर अनेक. त्यांच्यापैकी अनेकांनी फारसे शिक्षण घेतलेले नसते, पण मला त्यांच्यात सहानुभूती, शोषणाची समज आणि न्यायाची प्रबळ भावना दिसून आली आहे. तुम्ही त्यांना सामान्यातील असामान्य क्रांतिकारक म्हणू शकता. क्रांतिकारक या शब्दातून मला असे म्हणायचे नाही की ते व्यवस्था उलथवून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मला असे सांगायचे आहे की त्यांनी रूढींच्या बेड्या तोडल्या आणि आपल्या परीने नवे जग घडवण्यासाठी काम केले. त्यांच्यापैकी एक होते नियामत अन्सारी. ते झारखंडमधील मणिका भागात राहायचे. जवळपास वीस वर्षांपूर्वी मी त्यांना भेटलो होतो. तेव्हा ते आपला मित्र भूखन याच्यासोबत मनरेगामधील भ्रष्टाचाराविरुद्ध लढत होते. नियामत मुस्लिम होते आणि भूखन आदिवासी, पण ते दोघे सख्ख्या भावांसारखे होते. दोघेही नियामतच्या जुन्या मोपेडवर बसून गावोगावी जायचे आणि मनरेगाच्या कामांची तपासणी करायचे. भूखन आणि नियामत यांनी अनेक भ्रष्ट कंत्राटदारांचे बिंग फोडले होते. साहजिकच, कंत्राटदार त्यांच्यावर नाराज झाले आणि सूड उगवण्याच्या मागे लागले. नियामत आणि भूखन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात धाडण्यात आले. तुरुंगात त्यांच्यासोबत जे घडले, त्याबद्दल त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मी कधीच विसरू शकणार नाही. तिथे रात्री कैद्यांना स्वच्छतागृहात जाण्याचीही सोय नव्हती. पण तुरुंगातून सुटताच नियामत आणि भूखन यांनी पुन्हा भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरू केला. कंत्राटदारांनी त्यांच्या हत्येचा कट रचला 2 मार्च 2011 रोजी कंत्राटदारांच्या इशाऱ्यावरून माओवाद्यांच्या पथकाने नियामत यांना बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. भूखन यांनी शेतात लपून आपला जीव वाचवला. मणिकामध्ये अशा क्रांतिकारकांमध्ये अनेक महिलाही आहेत. त्यांच्यापैकी एक होत्या श्यामा सिंह. नियामत यांच्याप्रमाणे श्यामासुद्धा अत्याचार करणाऱ्यांसमोर उभे राहण्यास घाबरत नसत. त्यांनी मणिकाच्या अनेक महिलांना आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. 2015 मध्ये या महिलांनी अत्यंत कमी पैसे खर्च करून ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक जिंकण्यासाठी श्यामा यांना मदत केली होती. पण इतरांप्रमाणे श्यामा यांनी आपल्या पदाचा वापर पैसे कमवण्यासाठी केला नाही. पाच वर्षांनंतरही त्यांचे घर पूर्वीसारखेच राहिले आणि त्यांच्याकडे एका स्वस्त स्कूटीशिवाय दुसरे कोणतेही वाहन नव्हते. जेव्हा नियामत यांना मध्यरात्री मारहाण झाली होती, तेव्हा मणिका पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले नव्हते. अशा वेळी श्यामा यांनीच हिंमत दाखवली. त्या 10 किलोमीटर दूर असलेल्या आपल्या घरातून बाहेर पडल्या आणि नियामत यांना रुग्णालयात नेण्यासाठी तिथे पोहोचल्या. विशेष म्हणजे, त्या वेळी श्यामा नियामत यांच्यावर नाराज होत्या. पण त्यांनी आपली नाराजी विसरून त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली, कारण नियामत त्यांचे सहकारी होते. 18 जुलै 2026 रोजी घरात झाडू मारताना श्यामा यांना नागाने दंश केला. काही दिवसांनंतर पावसात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. गावातील प्रत्येक घरातून कोणी ना कोणी तिथे आले होते. त्यांचे शेजारी, नातेवाईक आणि मित्रांनी गावातील आदिवासींच्या सोप्या आणि खऱ्याखुऱ्या भाषेत त्यांच्याबद्दल आठवणी सांगितल्या. अगदी नव्या सरपंचांच्या डोळ्यांतही त्यांच्याबद्दल बोलताना पाणी होते, तर ते श्यामा यांचे राजकीय विरोधक होते. भूखन, नियामत आणि श्यामा यांच्यासारख्यांची नावे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सापडत नाहीत, पण ते आपल्यासाठी प्रेरणा आणि आशेचा किरण आहेत. आजची प्रचलित विचारधारा आपल्याला अशा लोकांची प्रशंसा करायला शिकवते, जे स्वतःसाठी चांगले करतात - करोडपती, नेते, टॉपर, स्टार वगैरे. यावरून आपल्याला असे वाटते की फक्त स्वतःसाठीच जगणे स्वाभाविक आहे, पण अनेक सामान्य लोकांचे आदर्श याहून कितीतरी उच्च असतात. मी त्यांना सलाम करतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) आज आपल्याला अशा लोकांची प्रशंसा करायला शिकवले जाते, जे स्वतःसाठी चांगले करतात. करोडपती, नेते, टॉपर, स्टार वगैरे. यातून असे वाटते की फक्त स्वतःसाठीच जगले पाहिजे, पण अनेक लोकांचे आदर्श याहून उच्च असतात.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *