एन. रघुरामन यांचा कॉलम:व्यवसाय मॉडेल बदलण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे

ग्रामीण भारतातील ‘ते’ सर्वकालीन चित्र आठवा. मुले अनवाणी पायांनी चिखलाने भरलेल्या रस्त्यांवर नाचत आहेत. पाण्याने भरलेल्या खड्ड्यांत उड्या मारत आहेत. पहिल्या पावसात भिजताना दोन्ही हात पसरून शाहरुख खानसारखी पोज करत आहेत. शहरी लोकांना हा पावसाचा उत्साही जल्लोष वाटतो. पण त्या मुलांसाठी हा खेळापेक्षा खूप काही जास्त आहे. त्यांना माहीत आहे की पावसाच्या प्रत्येक थेंबाचा अर्थ आहे जीवन- कौटुंबिक शेतांसाठी पाणी, जनावरांसाठी चारा, ताटातील अन्न आणि भविष्याची आशा. पण या वेळी मान्सूनमध्ये अशा दृश्यांची उणीव आहे. एल-निनोमुळे अनियमित आणि विलंबाने झालेल्या पावसाने केवळ शेतीची लयच बिघडवली नाही तर हा निरागस आनंदही हिरावून घेतला आहे. सहसा मुलांच्या किलबिलाटाने गुंजणारे गावांचे रस्ते जास्त वेळ धुळीने भरलेले राहिले. जेव्हा मान्सून थांबतो तेव्हा केवळ पिकेच नाही तर संपूर्ण ग्रामीण बालपणही त्याची वाट पाहते. त्यामुळेच महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या एका प्रयोगाकडे संपूर्ण देशाचे लक्ष गेले पाहिजे. सुमारे १६ लाख एकर शेतजमिनीत पसरलेला हा जिल्हा शेतीबद्दलच्या विचारात उल्लेखनीय बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. हजारो शेतकऱ्यांनी एकसारखेच पीक पेरावे आणि एकसारखीच जोखीम पत्करावी याऐवजी जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल एक मोहीम सुरू करून ७७८ ग्रामपंचायतींच्या ९७० गावांना आवाहन करत आहेत की, त्यांनी प्रत्येक गावात कमीत कमी २० एकर जमीन कमी पाण्यात येणाऱ्या आणि अधिक किंमत असलेल्या पिकांसाठी वेगळी ठेवावी. यामध्ये चिया सीड्स, तुती (मलबेरी), जवस, पांढरी मुसळी, शतावरी आणि रेशीम उत्पादन यांसारख्या पिकांचा समावेश आहे. हा पिकांमधील नियोजित वैविध्य आणण्याचा प्रयत्न आहे. अशा काळात जेव्हा हवामान-अनिश्चितता न्यू नॉर्मल बनली आहे तेव्हा अनपेक्षित मान्सूनच्या आव्हानांविरुद्ध ही भारतातील सर्वात महत्त्वाची जमिनीवरील चळवळीपैकी एक ठरू शकते. केवळ जालनाच नाही, पंजाबही अनेक दशकांपासून एक धडा देत आहे. भूजल पातळीत घट होऊनही तिथे शेतीमध्ये भात शेतीचे वर्चस्व राहिले आहे. पण आज अनेक प्रगतिशील शेतकरी जमिनीच्या एका भागात मका, भाज्या आणि फळांच्या बागा लावत आहेत. सिक्कीम वेगळ्या विचारांचे सर्वात मजबूत उदाहरण सादर करते. तिथल्या शेतकऱ्यांनी संपूर्ण राज्यात सेंद्रिय शेती अवलंबून उत्पादनाच्या प्रमाणावर स्पर्धा करण्याऐवजी प्रीमियम बाजारपेठांपर्यंत पोहोच मिळवली आहे. या बदलासाठी संयम लागला, पण आज राज्याची एक खास ओळख आहे, जी अधिक किंमत मोजणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करते. ओडिशाचे आदिवासी जिल्हे पूर्णपणे वेगळे मॉडेल दर्शवतात. हळद, आले आणि औषधी वनस्पतींची शेती करणारे शेतकरी, शेती उत्पादक संघटनांच्या माध्यमातून कौटुंबिक उत्पन्नात उल्लेखनीय सुधारणा करत आहेत. या संघटना धान्य गोळा करतात, गुणवत्ता सुधारतात आणि चांगल्या किमतींसाठी घासाघीस करतात. कमी पाऊस आणि अति तापमान असलेल्या गुजरातमधील कच्छमध्ये शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाने नापीक जमीन डाळिंब, खजूर आणि ड्रॅगन फ्रूटच्या फायदेशीर बागांमध्ये बदलली आहे. कधी काळी अशक्य वाटणारी गोष्ट आज फुल-फळणाऱ्या बागायतीवर आधारित अर्थव्यवस्था बनली आहे. जालन्याचे ‘२० एकर मॉडेल’ म्हणूनच इतके प्रभावी आहे. कारण ते शेतकऱ्यांना जमिनीच्या केवळ छोट्याशा भागावर प्रयोग करण्यास सांगते. पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याला पूर्ण शेत पणाला लावण्याची गरज नाही. विस्तार करण्यापूर्वी तो नवीन पिकाला केवळ अर्धा एकर जमीन देऊनही उत्पन्न, खर्च आणि जोखमीची तुलना करू शकतो. या सर्व उदाहरणांमध्ये एक समान धडा आहे. या सर्वांनी आपली जमीन हवामान अनुकूलतेची जिवंत प्रयोगशाळा बनवली. यश नेहमी अधिक जमिनीवर शेती केल्याने मिळत नाही. बऱ्याचदा ते या गोष्टीने मिळते की जमिनीतून समजदारीने उत्पादन कसे घ्यावे. या वर्षी जूनमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस आणि कमकुवत मान्सूनने आधीच ही चिंता वाढवली आहे की, पावसावर आधारित शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उत्पादनाचे नुकसान सोसावे लागू शकते. अशा वेळी पिकांची विविधता आणि हवामान-अनुकूल शेती अधिक महत्त्वाची झाली आहे. फंडा हा आहे की आज शेतीमध्येही वित्तीय सल्लागारांसारखा विचार हवा, जे बऱ्याचदा गुंतवणूकदारांना सांगतात की सर्व पैसे कोणत्याही एका शेअर किंवा मालमत्तेत लावू नका. जेव्हा एखादी गुंतवणूक अपेक्षेनुसार कामगिरी करत नाही तेव्हा विविधता तुमच्या व्यवसायाला आणि मालमत्तेला सुरक्षित ठेवते.

This post was originally published on this site.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *