कोल्हापूर: सोशल मीडियाची स्टंटबाजी पडली महागात; मसाई पठारावर हुल्लडबाजी करून वनस्पतींची नासधूस करणाऱ्या ५ तरुणांना वन विभागाचा दणका.

कोल्हापूर: मसाई पठारावर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी चालवलेले स्टंट्स भूभागावर गंभीर पर्यावरणीय परिणाम करत आहेत, ज्यामुळे पर्यावरणप्रेमी चिंतित आहेत. याच्या परिणामी, पन्हाळा वन विभागाने नुकत्याच कारवाईत पाच व्यक्तींवर ११,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. संवेदनशील गवताळ परिसंस्थेच्या संरक्षणाची तातडीची गरज या प्रकारामुळे अधोरेखित झाली आहे.


दरम्यान, वन विभागाने सोशल मीडियावरील व्हिडीओंची दखल घेत सूरज प्रकाश पाटील (रा. निवडे, ता. पन्हाळा), सुमित हिंदुराव गुरव, (रा. सोनुर्ले ता. शाहूवाडी), रोहित सुनील जाधव, (रा. कोलोली, ता. पन्हाळा), सूरज मारुती पाटील, (रा. नांदगाव, ता. शाहूवाडी) आणि सिद्धिराज ज्ञानदेव पाटील (रा. निवडे ता. पन्हाळा) या पाच जणांवर कारवाई करत ११ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.


पश्चिम घाटातील महत्त्वाचे गवताळ जैवविविधता क्षेत्र असलेल्या मसाई पठारावर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रानफुले, दुर्मीळ वनस्पती आणि सूक्ष्म जीवसृष्टी बहरते. मात्र, ऑफ-रोड ड्रायव्हिंगमुळे नाजूक वनस्पती तुडवल्या जात असून जमिनीचा नैसर्गिक पोत बदलत आहे. त्यामुळे केवळ मसाई पठारावर आढळणाऱ्या लव्हाळवर्गीय, कंदवर्गीय, दुर्मीळ ऑर्किड्स आणि कीटकभक्षी वनस्पतींसह संपूर्ण नैसर्गिक जीवनसाखळी धोक्यात येत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.


"संरक्षित वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश किंवा गैरप्रकार करणे हा कायद्याने गुन्हा असून भारतीय वन अधिनियम, १९२७ आणि वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत कारवाईची तरतूद आहे.

- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक (प्रादेशिक).
गवताळ परिसंस्था अत्यंत संवेदनशील असल्याने वाहनांच्या चाकांमुळे होणारे नुकसान दीर्घकालीन राहते. वन विभागाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित गस्त, सीसीटीव्ही किंवा ड्रोनद्वारे देखरेख आणि कठोर दंडाची आवश्यकता आहे. मसाई राखीव संवर्धन क्षेत्रासारख्या संवेदनशील परिसरात कायमस्वरूपी वनरक्षकांची नियुक्ती आणि नियमांचे कठोर पालन होणे गरजेचे आहे. प्रा. मकरंद ऐतवडे, वन्यजीव अभ्यासक."

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *