नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?

नवी दिल्ली: 'चलो संसद' मोर्चावर सोमवारी झालेला पोलिसांचा लाठीमार आणि अश्रुधुराच्या कारवाईनंतर मंगळवारी पुन्हा शेकडो विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) समर्थक जंतरमंतरवर तेवढ्याच उत्साहाने परतले आहेत. निःशस्त्र विद्यार्थ्यांवर केलेल्या बळाच्या वापरामुळे सीजेपीचे आंदोलन अधिकच मजबूत झाल्याचे चित्र आहे.

पोलिसांनी सोमवारी सायंकाळी जंतरमंतरवरील तंबू व व्यासपीठ उखडून टाकून उर्वरित विद्यार्थ्यांना हटवले होते. त्यानंतर दीपके यांच्यासह कार्यकर्ते रात्रभर जवळच्याच केरळ हाऊस परिसरात थांबून होते. मात्र, मंगळवारी दिवसाच्या सुरुवातीलाच सीजेपीने पुन्हा जंतरमंतरवरच आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला. समाज माध्यमांवरून हे वृत्त पसरताच विद्यार्थी जंतरमंतरवर जमा होऊ लागले. सकाळी साडेऊनच्या सुमारास आंदोलनस्थळ भरून गेले. पोलिसांनी हटवलेले तंबू पूर्ववत करण्यात आले. ज्या व्यासपीठावर वांगचुक उपोषणाला होते, तिथे आंदोलकांनी ठाण मांडले आहे. एकीकडे या आंदोलनाला पाठिंबा वाढत असताना आता आंदोलकांचे संदेश दिल्ली पोलिसांच्या रडारवर आल्याचे पाहायला मिळत आहे.

 

विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सीजेपीच्या मोर्चाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आंदोलकांमध्ये झालेला कथित संवाद उघडकीस आला आहे. संदेशांतून असे दिसून येते की, इंटरनेट सेवा बंद पडल्यास संपर्क कायम राखण्याची तयारी केली जात होती; तसेच या उद्देशासाठी जीव देण्याची तयारीही दर्शवली जात होती. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी तपास अधिकारी त्या 'चॅट्स'ची सत्यता आणि त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पडताळून पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आंदोलकांनी ब्लूटूथ सिग्नल वापरून काम करू शकणाऱ्या काही ॲप्लिकेशन्सचीही सूचना केली होती, असेही तपासात समोर आले आहे.

दिल्ली पोलिसांचा खुलासा
सीजेपीने आयोजित केलेल्या 'चलो संसद' मोर्चा रोखल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराचा मारा केला. मात्र, रोखलेल्या आंदोलकांपैकी एकही जण ताब्यात नाही, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीने दावा केला होता. मात्र, नंतर सर्व समर्थकांची सुटका झाल्याचे स्पष्ट करून, सीजेपीने दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयासमोर होणारे आंदोलन मागे घेतले. तत्पूर्वी, सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी 'एक्स'वर पोस्ट करून आरोप केला होता की, पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करून शेकडो लोकांना ताब्यात घेतले आहे आणि वकिलांनाही त्यांची भेट घेऊ दिली जात नाही. यावर दिल्ली पोलिसांनी खुलासा करताना नागरिकांनी कोणत्याही पडताळणीशिवाय अफवा किंवा अपमाहिती पसरवू नये, असे आवाहन केले.

अभिजीत दीपके यांचे गंभीर आरोप
अभिजीत दीपके म्हणाले की, "सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या संघर्षाने आम्ही घाबरलेलो नाही. उलट या घटनेमुळे आंदोलनात अधिक लोक सामील झाले आहेत. सरकारने आमचा वेळ वाया घालवला. त्यांनी आमच्या शिष्टमंडळाला बोलावून त्यांचे मोबाइल फोन जप्त केले. आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी अक्षरशः नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आमच्या टीमला पांगवण्याची सरकारची संपूर्ण योजना होती जेणेकरून गोंधळ उडल्यावर तिथे कोणीही उपस्थित राहणार नाही. म्हणूनच त्यांना पाच तास थांबवून आमचा वेळ वाया घालवला. एकीकडे तुम्ही चर्चेचे आवाहन करता, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांवर लाठीमार करता, हे योग्य नाही. आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे." दरम्यान, दीपके यांच्या आरोपांवर केंद्र सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *