मुंबई: दहीहंडी उत्सव २०२६ साईलीला क्रीडा मंडळाचे ९ थरांचे लक्ष्य, तर ठाण्यात ११ थरांसाठी तब्बल २१ लाखांचे घसघशीत इनाम जाहीर!

मुंबई: ठाणे परिसरात आज दहीहंडीचा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. सुट्टीचा दिवस आणि दहीहंडीचा तुफान उत्साह यामुळे आज सकाळपासूनच संपूर्ण मुंबई आणि उपनगर 'गोविंदादमय' झाले आहेत. सकाळपासूनच विविध गोविंदा पथकांची लगबग, मंडळांची अंतिम तयारी आणि ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला आहे. गोविंदांच्या थरांना आणि त्यांच्या साहसाला दाद देण्यासाठी मुंबईकर नागरिक मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसह रस्त्यांवर उतरले आहेत.

साईलीला क्रीडा मंडळाचे ९ थरांचे टार्गेट: गोविंदा पथकांसाठी आजच्या दिवसाची सुरुवात सकाळीच अत्यंत उत्साहात झाली. ठरलेल्या वेळेत सर्व गोविंदा एकत्र येणे, मानवी थरांची उजळणी करणे आणि त्यानंतर विविध भागांत मानाच्या हंड्या फोडण्यासाठी रवाना होणे, अशी त्यांची मोठी धावपळ उडाली आहे. प्रसिद्ध अशा 'साईलीला क्रीडा मंडळा'चे सुमारे ३०० गोविंदा सकाळीच ८ वाजता आपापल्या ठिकाणांहून बाहेर पडून ठाणे, घाटकोपर, विक्रोळी, गोरेगाव यांसारख्या विविध भागांत दहीहंडी फोडण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी आठ थरांची यशस्वी सलामी देणारे हेच जिद्दी पथक यंदा थेट नऊ थरांचे मोठे लक्ष्य ठेवून मैदानात उतरले आहे. "यंदा आम्ही ९ थरांची यशस्वी सलामी देऊ, असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे," असा विश्वास या पथकातील गोविंदांनी व्यक्त केला आहे.

 

 

ठाण्यात ११ थरांसाठी २१ लाखांची बक्षिसांची लयलूट: मुंबई महानगर प्रदेशामध्ये विशेषतः ठाणे परिसरात सर्वाधिक उंच दहीहंड्यांचे आयोजन केले जाते. त्यामुळे मुंबईसह आसपासच्या सर्वच प्रमुख शहरांमधून गोविंदा पथकांची ठाण्यात सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ठाणे शहरात एकूण ५४३ हंड्यांचे आयोजन करण्यात आले असून, यात १०३ सार्वजनिक, ४४० खासगी आणि ३४ अत्यंत मानाच्या व मोठ्या दहीहंड्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या दहीहंडी उत्सवात ११ थरांच्या विक्रमी मानवी मनोऱ्यासाठी तब्बल २१ लाख रुपयांचे, तर १० थरांसाठी ११ लाखांपर्यंतची विक्रमी पारितोषिके आयोजकांकडून जाहीर करण्यात आली आहेत. या प्रचंड रकमेच्या बक्षिसांमुळे गोविंदा पथकांमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली असून विक्रमी उंचीचे थर रचण्यासाठी गोविंदा पूर्ण जीान लावून प्रयत्न करत आहेत.

सुरक्षा आणि विम्याची विशेष खबरदारी: दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुरक्षेच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यंदाच्या उत्सवासाठी सुमारे १ लाख ६५ हजारांहून अधिक गोविंदांचा अपघात विमा शुक्रवारी संध्याकाळपर्यंत उतरवण्यात आला आहे. यामध्ये एकूण १ हजार ९५० हून अधिक मानाची आणि तरुण गोविंदा पथके सहभागी झाली आहेत. गेल्या वर्षी हा आकडा १ लाख ५५ हजार गोविंदांपर्यंत होता, तर मंडळांची संख्या १ हजार ८५० च्या आसपास होती. दरम्यान, १४ वर्षाखालील बालकांना दहीहंडीच्या थरांमध्ये सहभागी होण्यावर सक्त बंदी घालण्यात आली असून, सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक उपक्रमांची जोड आणि उत्सवाचा उत्साह यामुळे यंदाची दहीहंडी अत्यंत संस्मरणीय ठरत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *