प्रो. अविनाश कुमार अग्रवाल यांचा कॉलम:एआय शिकण्याची जागा घेणार नाही, पण पद्धत नक्की बदलेल

जेन-झी आणि जेन-अल्फा एका अशा शैक्षणिक जगात प्रवेश करत आहेत. ते आधीच्या पिढ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्यांच्याकडे इंटरनेट, डिजिटल प्लॅटफॉर्म, स्मार्टफोन, एआयची अभूतपूर्व उपलब्धता आहे. आजचा विद्यार्थी जगभरातील संसाधनांमधून शिकू शकतो. तो एआयचा वापर ‘लर्निंग असिस्टंट’ म्हणून करू शकतो. गुंतागुंतीच्या प्रणालींचे सिम्युलेशन करू शकतो. मोठ्या डेटासेटचे विश्लेषण करू शकतो.जगाच्या पाठीवरील कोणत्याही लोकांशी सहकार्य करता येते. पण, माहिती मिळणे म्हणजे ज्ञान नव्हे आणि एआय उपलब्ध असणे म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे. हे आपण समजून घेतले पाहिजे. आजच्या शिक्षणव्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान हेच आहे. विद्यार्थ्यांनी केवळ माहिती किंवा उत्तरे मिळवणे शिकू नये. त्यांनी चिकित्सक विचार करावा. योग्य प्रश्न विचारावेत. तर्कशुद्ध विचार करून कल्पकतेने काम करावे आणि स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्यावी. शिक्षणव्यवस्थेला आता माहिती केंद्रित मॉडेलकडून कौशल्य, उत्सुकता व समस्या निवारण केंद्रित मॉडेलकडे जावे लागेल. एआय शिक्षणात शिकण्याची जागा घेणार नाही. पण ते शिकणे समृद्ध करणारे एक माध्यम नक्की बनेल. विद्यार्थी माहिती मिळवण्यासाठी पर्यायी स्पष्टीकरणे समजून घेण्यासाठी त्वरित अभिप्राय घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या परिस्थितींचे सिम्युलेशन करण्यासाठी याचा वापर करू शकतात. पण त्यांची मूलभूत समज इतकी मजबूत असणे गरजेचे आहे. जेणेकरून ते एआयच्या उत्तरावर प्रश्न उपस्थित करू शकतील. त्याच्या चुका ओळखू शकतील आणि माहितीची पडताळणी करू शकतील. अत्यंत प्रगत एआय मॉडेलसुद्धा चुका करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयच्या उत्तरांवर आंधळा विश्वास ठेवू नये. त्यांनी उत्तरे पारखून घेण्याची आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. आपले ध्येय केवळ एआय वापरकर्ते तयार करणे हे नाही. तर कुशल, नवनिर्मितीक्षम व जबाबदार माणूस तयार करणे हे असले पाहिजे. शिक्षक आता केवळ माहिती देणारी व्यक्ती राहू शकत नाहीत. त्यांना मार्गदर्शक, प्रेरक व चिंतकाची भूमिका बजवावी लागेल. कोणती माहिती विश्वासार्ह आहे, ज्ञानाची निर्मिती कशी होते आणि त्याचा मानवतेच्या कल्याणासाठी कसा वापर करता येईल, याचे मार्गदर्शन शिक्षकांना करावे लागेल. जेन-झी आणि जेन-अल्फा डिजिटलदृष्ट्या सक्षम आहेत. पण याचा अर्थ त्यांना शिस्तीची गरज नाही असा होत नाही. उलट त्यांना एका वेगळ्या प्रकारच्या शिस्तीची गरज आहे. त्यांनी स्वतःचे लक्ष एकाग्र करायला शिकले पाहिजे. तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर केला पाहिजे. सातत्य ठेवून नैतिक निर्णय घेतले पाहिजेत. आपल्या कामाच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. शिक्षणातील शिक्षक-विद्यार्थी नाते आजही केंद्रस्थानी राहील. एआयच्या युगात या नात्याचे महत्त्व अधिकच वाढेल. शिक्षणातील तंत्रज्ञान हे मानवी स्पर्शाला पर्याय ठरू शकत नाही, तर ते त्याचे सहाय्यक बनले पाहिजे. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेचा पाया आजही तितकाच प्रासंगिक आहे. बदल म्हणजे जुनी व्यवस्था मोडीत काढणे नव्हे, तर तिला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाणे होय. गणित, विज्ञान, अभियांत्रिकी, मानव्यविद्या , संवादकौशल्य, नैतिकता आणि चिकित्सक विचार या मूलभूत विषयांना टिकवून ठेवावे लागेल. त्याच वेळी यांना एआय, डेटा सायन्स, रोबोटिक्स, प्रगत मॅन्युफॅक्चरिंग, बायोटेक्नॉलॉजी, सेमीकंडक्टर्स, ऊर्जा, आरोग्यसेवा आणि हवामान तंत्रज्ञान यांसारख्या उगवत्या क्षेत्रांशी जोडावे लागेल. आपल्याला आता शिक्षण अधिक लवचिक आणि बहुआयामी बनवावे लागेल. ऊर्जा, आरोग्यसेवा, वाहतूक, हवामान बदल, शेती, पाणी आणि शहरीकरण या 21 व्या शतकातील समस्या आहेत. यांचे निवारण केवळ एका विषयाच्या आधारे होऊ शकत नाही. यासाठी अभियंते, शास्त्रज्ञ, डिझायनर्स, समाजशास्त्रज्ञ आणि धोरणकर्त्यांनी चौकटीबाहेर येऊन एकत्र काम करावे. जेन-झी आणि जेन-अल्फा तंत्रज्ञानाशी सहज जुळवून घेतात. ही त्यांची मोठी ताकद आहे. पण वेगाने माहिती मिळवण्याच्या सवयीमुळे, सखोल शिकण्यासाठी लागणारा संयम कमी पडतो. तेव्हा खरा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच वर्गात शिकण्याचे असे वातावरण तयार करावे लागेल. येथे विद्यार्थी गोष्टींचा सखोल शोध घ्यायला शिकतील. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एआयचा वापर करायला जरूर शिका. पण, त्याचा वापर कधी करायचा नाही, हेही समजून घ्या. तंत्रज्ञान हे एक साधन आहे. ते वेळेनुसार बदलत राहील. तंत्रज्ञान मानवी क्षमता नक्कीच वाढवू शकते. परंतु त्या क्षमतेचा सार्थक, जबाबदार वापर कसा करायचा, हे ते ठरवू शकत नाही.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *