मुसळधार पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा! १०७ पूल-मोऱ्यांसह १६६ किलोमीटर रस्ते उध्वस्त; प्रशासनाकडून ६८ कोटींच्या निधीची मागणी

पुणे जिल्ह्यात मागील काळात झालेल्या मुसळधार अतिवृष्टी आणि पुरामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्ते, पूल आणि मोऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, जिल्ह्यातील तब्बल सात तालुक्यांमध्ये १६६.११ किलोमीटर लांबीचे रस्ते आणि तब्बल १०७ पूल व मोऱ्या अतिवृष्टीमुळे बाधित झाल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व नुकसान झालेल्या रस्त्यांची आणि पुलांच्या तातडीने दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने शासनाकडे तब्बल ६८ कोटी २६ लाख रुपयांच्या विशेष निधीची मागणी केली आहे.

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रामुख्याने डोंगराळ आणि घाटमाथ्याचा भाग असलेल्या सात तालुक्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. यामध्ये भोर, मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या दुर्गम भागांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर धूप झाली असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवरून पाण्याचा प्रवाह वाहत राहिल्याने रस्ते वाहून गेले आहेत, तर अनेक पूल व मोऱ्यांच्या संरचनेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील दळणवळण आणि शाळकरी मुलांची व कामगारांची ये-जा सुरळीत ठेवण्यासाठी या रस्त्यांची आणि पुलांची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

संबंधित सात तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील रस्त्यांची एकूण लांबी ४ हजार ८७०.३१ किलोमीटर असून, त्यापैकी १६६.११ किलोमीटरचे रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीनुसार, नुकसानग्रस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४९ कोटी १६ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे, तर पूल व मोऱ्यांच्या पुनर्बाबांधणी व दुरुस्तीसाठी १९ कोटी १० लाख रुपयांची गरज भासणार आहे.

तालुकनिहाय नुकसानीची सविस्तर स्थिती:

  • मुळशी तालुका: येथे सर्वाधिक ६५.८० किलोमीटर रस्त्यांचे नुकसान झाले असून २२ पूल व मोऱ्यांना फटका बसला आहे. या कामांसाठी प्रशासनाने १७ कोटी ६५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.

  • खेड तालुका: ३३.८३ किलोमीटर रस्ते आणि सर्वाधिक ३० पूल व मोऱ्यांचे नुकसान झाले असून, दुरुस्तीसाठी तब्बल २३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

  • भोर तालुका: १९.६६ किलोमीटर रस्ते आणि ३ पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून १० कोटी ७५ लाख रुपयांची गरज आहे.

  • जुन्नर तालुका: १५.४० किलोमीटर रस्ते आणि २२ पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून ६ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मागितला आहे.

  • आंबेगाव तालुका: १२.७० किलोमीटर रस्ते आणि ८ पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून ४ कोटी ८१ लाख रुपये आवश्यक आहेत.

  • मावळ तालुका: १५ किलोमीटर रस्ते आणि २ पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून २ कोटी ५० लाख रुपयांची मागणी आहे.

  • वेल्हे तालुका: ३.७२ किलोमीटर रस्ते आणि २० पूल-मोऱ्यांचे नुकसान झाले असून ३ कोटी २५ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

ग्रामीण भागातील या महत्त्वाच्या रस्त्यांची आणि पुलांची तातडीने मलमपट्टी करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून, लवकरात लवकर निधी प्राप्त होऊन दुरुस्तीचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *