एन. रघुरामन यांचा कॉलम:अत्यल्प पैसे असतात, तेव्हाअशा पैशांचे मूल्य बदलून जाते

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या रमाबाई रणवीर यांची गोष्ट फक्त त्यागाची नाही. 5 हजार रुपयांसारखी छोटी रक्कम वेगवेगळ्या हातांत गेल्यावर तिची किंमत कशी बदलते, हे ती सांगते. 47 वर्षांच्या रमाबाई बीडच्या ध्यानदीप अकादमीच्या स्वयंपाकघरात काम करतात. 9 हजार रुपये महिन्याच्या पगारावर त्या रोज 200 पेक्षा जास्त चपात्या बनवतात. 2012 मध्ये पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या दोन मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी हे काम सुरू केले. त्यांची लहान मुलगी आरती (20) ही बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी आहे. ती नांदेडमध्ये एकटी राहते. 28 ऑगस्टला तिने फोन करून जेवणासाठी आणि खोलीच्या भाड्यासाठी पैसे मागितले. रमाबाईंकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्या रात्रभर झोपू शकल्या नाहीत. त्याच संध्याकाळी रमाबाईंनी एक गोष्ट ऐकली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी होणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेत त्या पहिल्या आल्या, तर त्यांना 3 हजार रुपये बक्षीस मिळू शकतात. धावण्याची शर्यत म्हणजे काय, हेसुद्धा त्यांना ठाऊक नव्हते. या लांब आणि कठीण शर्यतीसाठी आपले कोणतेही प्रशिक्षण झालेले नाही, याची त्यांनी पर्वा केली नाही. तिथे बिनाबुटांची धावणारी त्या एकमेव स्पर्धक होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी विधवा रामाबाई पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसोबत पिकअप गाडीत बसून निघाल्या. त्या ज्या अकादमीत काम करायच्या, तिथूनच त्या निघाल्या होत्या. त्या आपल्या आयुष्यातील पहिल्या शर्यतीत भाग घेणार होत्या. त्या साडी घालूनच धावल्या. धावताना त्यांची चप्पलही तुटली. पण 3 किलोमीटरची शर्यत पूर्ण होईपर्यंत त्या धावतच राहिल्या. आपण जिंकलो तर मुलीच्या शिक्षणाच्या खर्चाची अडचण थोडी कमी होईल, एवढाच विचार त्यांच्या मनात होता. शेवटी एका आईच्या या ठाम जिद्दीचा विजय झाला. शर्यत जिंकल्यानंतर त्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, ‘माझे आयुष्य याच शर्यतीवर अवलंबून आहे, असा विचार करून मी धावले. हे अंतर पार करायला मला किती वेळ लागेल, हे मला माहीत नव्हते. अंतिम रेषा पार केल्यानंतरच मी थांबले.’ त्यांना 3 हजार रुपयांऐवजी 5 हजार रुपये देण्यात आले. त्यांनी लगेच आपल्या दुसऱ्या मुलीसाठी, पूजासाठी वह्या आणि पेन खरेदी केले. उरलेले पैसे त्यांनी आरतीसाठी बाजूला ठेवून दिले. रमाबाईंसारखे अनेक आई-वडील संपूर्ण भारतात आहेत. हे पालक रोज आपल्या परीने अशक्य वाटणारे गणिताचे हिशोब जुळवत असतात. ‘मी आज कोणता खर्च टाळावा जेणेकरून माझ्या मुलाला त्याचे स्वप्न बाजूला ठेवावे लागणार नाही?’ असा विचार ते करतात. अनेक वर्षांपूर्वी नागपूरच्या सौनित्रा इंगळे या ऑटोरिक्षाचालकाची अशीच एक गोष्ट होती. ते महिन्याला अवघे 2500 रुपये कमवायचे. पण मुलीच्या शिक्षणासाठी ते रोज 20 रुपये बाजूला ठेवायचे. ते स्वतः अत्यंत कठीण परिस्थितीत वाढले होते. त्यामुळे आपल्याला संधी मिळाल्या नाहीत. त्या मुलीला मिळाव्यात अशी त्यांची इच्छा होती. ही रक्कम ऐकायला खूप छोटी वाटते. पण एवढे कमी कमावणारा माणूस रोज 20 रुपये वाचवत असेल, तर याचा अर्थ तो स्वतःच्या तात्कालिक गरजांपेक्षा मुलीच्या भविष्याला जास्त महत्त्व देत होता. याच वर्षी मार्च महिन्यात यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2025-2026 मध्ये पहिल्याच प्रयत्नात देशभरात 57 वी रँक मिळवणाऱ्या केरळातील तिरुवनंतपुरमच्या जे. एस. श्रीजा हिने आपल्या पालकांच्या त्यागाबद्दल सांगितले. तिचे वडील जयकुमार हे गवंडीकामात मदत करणारे रोजंदारी मजूर आहेत. ते कामावर जाण्या-येण्यासाठी रोज 40 किलोमीटर सायकल चालवायचे. श्रीजाच्या शिक्षणासाठी त्यांनी पत्नीचे मंगळसूत्र आणि घरातील सोने गहाण ठेवून 8 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. श्रीजाचे पूर्ण लक्ष अभ्यासावर राहावे म्हणून ते रात्री स्वयंपाकघरातही मदत करायचे. छत्तीसगडमध्ये ज्योती पाटील यांनी पतीच्या निधनानंतर कुटुंब चालवण्यासाठी आणि मुलीचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ऑटोरिक्षा चालवायला सुरुवात केली. नंतर त्यांची मुलगी वर्तिका ही रायपूरच्या सरकारी शाळेतील अशा दोन विद्यार्थ्यांपैकी एक ठरली, जिच्या जलसंरक्षण प्रकल्पाचे आयआयटी तिरुपतीमधील एका स्पर्धेत आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी कौतुक केले. फंडा असा आहे की, आज मी काय त्याग करू शकतो, जेणेकरून माझ्या मुलाला उद्या कोणताही त्याग करावा लागणार नाही? असा विचार आई-वडील करतात. तेव्हा छोटी रक्कमसुद्धा छोटी राहत नाही. कारण तीच छोटी रक्कम उद्या आशा, सन्मान व कधी-कधी मुलाच्या भविष्याचे मूल्य ठरू शकते.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *