गडचिरोली: धावत्या एसटी बसचे चाक निखळून १०० फूट दूर शेतात पडले; चालकाच्या प्रसंगावधानाने २८ प्रवाशांचा जीव वाचला!

गडचिरोली: जिल्ह्यातील मेळाराम गावाजवळ बुधवारी एसटी बसच्या सुरक्षेबाबत अत्यंत थरारक आणि गंभीर घटना समोर आली आहे. अहेरी आगारातून सिरोंच्याकडे जाणाऱ्या एका धावत्या एसटी बसचे मागील चाक अचानक निखळले. हे चाक मुख्य बसपासून तब्बल १०० फूट दूर जाऊन पडले. घटनेच्या वेळी बसमध्ये २८ प्रवासी प्रवास करत होते. मात्र, चालकाने अत्यंत चातुर्य आणि प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रित केली व सुरक्षितपणे थांबवली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

नेमकी घटना कशी घडली?
अहेरी आगाराची एसटी बस नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन सिरोंच्याच्या दिशेने निघाली होती. मेळाराम गावाजवळ बस आलेली असताना अचानक मोठा आवाज झाला आणि चालत्या बसचे मागील चाक निखळून वेगाने १०० फूट दूर जाऊन पडले. चाक निघाल्याचे लक्षात येताच चालकाने अजिबात न घाबरता तातडीने स्टीअरिंगवर नियंत्रण मिळवले आणि बस रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे थांबवली. पाठीमागील दुसरे चाकही बाहेर पडणार होते, यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

 

 

प्रि-ट्रिप तपासणीचा दावा अन् प्रशासनाचा अजब कारभार !
या घटनेनंतर आगाराच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, 'प्री-ट्रिप तपासणी दरम्यान बसचे सर्व नट-बोल्ट आणि तांत्रिक बाबी तपासल्याचा दावा आगार प्रशासनाकडून केला जात आहे. जर गाडी सुस्थितीत होती आणि सर्व बोल्ट तपासले होते, तर मग धावत्या बसचे चाक अशा प्रकारे कसे निखळले? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, चाक निखळण्यामागचे नेमके तांत्रिक कारण काय होते, याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *