Bhagat Singh Koshyari | राज ठाकरेंनी घाबरू नये, त्यांनी नरेंद्र मोदींना…भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!

मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना कोश्यारी यांनी सांगितले की, “मी राज ठाकरे यांचा सन्मान करतो, मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना काहीसे जास्तच घाबरतात असे वाटते.” त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

कोश्यारी पुढे म्हणाले की, “मोदींना घाबरण्याचे काहीही कारण नाही. त्यांनी त्यांच्या जवळ जावे, संवाद साधावा. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आहात. या भूमीत धैर्य आणि स्वाभिमानाची परंपरा आहे. त्यामुळे कुणालाही घाबरण्याची गरज नाही.”
याशिवाय, कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचेही कौतुक केले. “जसे प्रभू रामासाठी संपूर्ण प्रजा समान होती, तसेच नरेंद्र मोदींसाठीही सर्व जनता समान आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या मते, मोदी देशाच्या सर्व घटकांना समान दृष्टीने पाहतात आणि सर्वांच्या विकासासाठी कार्य करतात.
दरम्यान, कोश्यारी यांच्या या विधानामुळे मनसे आणि भाजप यांच्यातील संबंधांबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे या वक्तव्याला कशी प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *