चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा

चेन्नई:  देशात २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अजून काही काळ बाकी असला, तरी आतापासूनच राजकीय वर्तुळात पंतप्रधानपदाच्या दावेदारावरून चुरस पाहायला मिळत आहे. एकीकडे राजकीय आघाड्या आणि विविध सर्वेक्षणे समोर येत असताना, दुसरीकडे तामिळनाडूच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधानपदावरून आता तामिळनाडूतील काँग्रेस पक्ष आणि 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) पक्ष यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली असून, काँग्रेसने थेट मंत्रिमंडळातील राजीनाम्याचा इशारा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमका वाद?

काही दिवसांपूर्वी 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) चे प्रमुख तथा तामिळनाडूचे नेते सी. जोसेफ विजय यांना देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. टीव्हीके पक्षाच्या गोटातून आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री एम. शरतकुमार यांनी, विजय हेच देशाचे पुढील पंतप्रधान असतील असा जोरदार दावा केला होता. अभिनेते-राजकारणी विजय यांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या दाव्यामुळे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

काँग्रेस नेते राजेश कुमार यांचा कडक इशारा:

तमिळनाडू सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते राजेश कुमार यांनी यावर उघडपणे प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत सांगितले की, २०२९ मध्ये देशाचे पंतप्रधान केवळ आणि केवळ राहुल गांधी हेच असतील. जर 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) किंवा त्यांचे नेते या भूमिकेशी सहमत नसतील आणि त्यांनी राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाला किंवा दाव्याला समर्थन दिले नाही, तर तामिळनाडू मंत्रिमंडळात सहभागी असलेले काँग्रेसचे मंत्री क्षणाचाही विलंब न लावता आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे देतील, असा सज्जड दम आणि इशारा काँग्रेस नेते राजेश कुमार यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे.

देशभरातील सर्वेक्षणातील आकडेवारी:

नुकत्याच समोर आलेल्या एका राष्ट्रीय सर्वेक्षणात देशात जर आज निवडणुका झाल्या तर कोणाला पसंती मिळेल, याचे चित्र समोर आले होते. या सर्वेक्षणात देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हेच लोकांची पहिली पसंती असल्याचे दिसून आले, तर दुसऱ्या स्थानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जनतेने कौल दिला आहे. विशेष म्हणजे, या सर्वेक्षणात तामिळनाडूचे नेते सी. जोसेफ विजय हे तब्बल ९ टक्के मते मिळवून थेट तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत विजय यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या स्थानी येणे हे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का मानला जात आहे. याच राजकीय घडामोडींमुळे तामिळनाडूतील आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत असल्याचे दिसत आहे.



शहर

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *