Purandar Airport : नवी मुंबईनंतर महाराष्ट्राला आणखी एक विमानतळ; येत्या वर्षात कामाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं?

Pune : पुण्यातील वाहतुकीसाठी पुरंदर विमानतळ खूप महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असलेल्या या विमानतळासाठी आता तब्बल 96 टक्के शेतकऱ्यांनी परवानगी दिली आहे.

या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुरंदर विमानतळामुळे पुणे आणि परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. प्रवासी सेवेसोबतच येथे मालवाहतुकीचीही मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्याच्या जीडीपीमध्ये तब्बल दोन टक्क्यांची वाढ होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

Baramati : बारामतीचं राजकारण वेगळंच! नवनिर्वाचित नगरसेविकेची थेट हत्तीवरून भव्य मिरवणूक, शहरात चर्चेला उधाण

पुरंदर विमानतळासाठी तालुक्यातील एकूण सात गावांना फटका बसणार होता. या गावांमधील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होता. मात्र आता 96 टक्के शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी संमती दिल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच या सात गावांतील ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. काही गावांच्या प्रतिनिधींनी सध्याच्या प्रति एकर 1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईत वाढ करण्याची आणि अतिरिक्त लाभ देण्याची मागणी केली. तर काही प्रतिनिधींनी संपूर्ण भूसंपादनालाच विरोध दर्शवला. काही शेतकऱ्यांनी प्रति एकर 15 कोटी रुपयांचा मोबदला आणि कुणबी प्रमाणपत्रांचीही मागणी केली आहे.

दरम्यान, प्रकल्पाची माहिती देताना पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी सांगितले, “या विमानतळासाठी डोंगर कापण्याची गरज नाही. कोणत्याही नदीचा प्रवाह बदलावा लागणार नाही. जमिनीचे थर अत्यंत मजबूत असल्याने उत्खनन आणि इतर कामे वेगाने पूर्ण होतील. त्यामुळे एकदा प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर तीन ते साडेतीन वर्षांत विमानतळ पूर्ण करता येईल.”

पुढील वर्षात भूसंपादनाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष बांधकामालाही सुरुवात होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या बहुतांश अटी मान्य करण्यात आल्या असून, आता केवळ प्रति एकर मोबदल्याच्या रकमेसंदर्भात चर्चा सुरू आहे. या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना योग्य आणि जास्तीत जास्त मोबदला दिला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *