हॉटेलमधील 'जार'च्या अशुद्ध पाण्याला बसणार लगाम! तुकाराम मुंढे तयार करणार कडक SOP; राज्य सरकारचे विधानसभेत मोठे निर्देश!

मुंबई: राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या जारमधील (Jar Water) आणि बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर आता अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) कडक वचक असणार आहे. राज्यात जार व खुल्या पद्धतीने पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यात येत असलेल्या कायदेशीर अडचणींची कबुली सरकारने विधानसभेत दिली आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांना जार आणि बाटलीबंद पाण्याच्या पुरवठ्यासाठी विशेष नियमावली म्हणजेच 'एसओपी' (SOP - Standard Operating Procedure) तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभेत नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.

३ वर्षांत २० पाण्याचे नमुने आढळले थेट 'असुरक्षित'

विधानसभेत आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या ३ वर्षांत (१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६) एफडीएने (FDA) पाण्याच्या उत्पादक कंपन्यांवर १८२ वेळा छापे टाकून तपासणी केली. प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवलेल्या १७७ नमुन्यांपैकी ११५ नमुने प्रमाणित आढळले. मात्र, १३ नमुने कमी दर्जाचे, ४ नमुने दिशाभूल करणारे (मिथ्याछाप) आणि तब्बल २० नमुने मानवी आरोग्यासाठी थेट 'असुरक्षित' आढळले आहेत. जारच्या पाण्याचा थेट आरोग्याशी संबंध असल्याने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे बनले आहे.

हॉटेल्सना पिण्याचे शुद्ध पाणी मोफत देणे बंधनकारक

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र' या मोहिमेची व्याप्ती वाढवली आहे. नवीन नियमांनुसार, राज्यातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना ग्राहकांसाठी पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हॉटेल्सनी ग्राहकांसाठी "येथे पिण्याचे शुद्ध पाणी मोफत मिळेल" अशा आशयाचा स्पष्ट फलक (बोर्ड) दर्शनी भागात लावणे सक्तीचे आहे. हॉटेलमध्ये आल्या आल्या ग्राहकांसमोर थेट विकतच्या पाण्याच्या बाटल्या ठेवता येणार नाहीत; जर ग्राहकाने स्वतःहून बाटलीबंद पाणी मागितले, तरच ते त्याला दिले जावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक; नियम मोडल्यास कडक कारवाई

अशुद्ध किंवा दूषित पाण्याच्या पुरवठ्याबाबत ग्राहकांना थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवता यावी, यासाठी १८००२२२३६५ हा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी हॉटेल चालकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे की, "जर नियमांचे पालन केले, तर कुणीही विनाकारण कारवाई करणार नाही, परंतु ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करून नियमांचे उल्लंघन केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही." आयुक्त मुंढे यांच्याकडून लवकरच लागू होणाऱ्या या नवीन 'एसओपी'मुळे राज्यातील पाण्याचे जार आणि अन्न प्रक्रियेच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *