आलमट्टीच्या उंचीवरून कर्नाटकची मनमानी! महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; जलतज्ज्ञ प्रभाकर केंगार यांचे आवाहन

सांगली:कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणाची उंची ५२४.२६ मीटरपर्यंत वाढवून कृष्णा पाणी वाटप तंटा लवादाच्या (Krishna Water Disputes Tribunal) निर्णयाचे, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे थेट आणि उघड उल्लंघन केले आहे. कर्नाटकच्या या एकतर्फी व मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असे स्पष्ट व आक्रमक आवाहन निवृत्त जलसंपदा अधिकारी तथा जलतज्ज्ञ प्रभाकर केंगार यांनी केले आहे.

नक्की काय आहे वाद?

कृष्णा नदीच्या पाणी वाटपावरून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. जलतज्ज्ञ केंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा नदीच्या खोऱ्यात कोणताही नवीन प्रकल्प हाती घ्यायचा असल्यास किंवा विद्यमान धरणाची साठवण क्षमता अथवा उंची वाढवायची असल्यास कृष्णा पाणी वाटप तंटा लवादाची पूर्वमान्यता घेणे कायदेशीररीत्या अनिवार्य आहे.

परंतु, कर्नाटक सरकारने कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता आणि कायदेशीर चौकटीचे उल्लंघन करत आलमट्टी धरणाची उंची ५२४.२६ मीटरपर्यंत वाढवण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे.

पश्चिम महाराष्ट्रावर महापुराचे संकट:

कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीकाठच्या भागांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात आलमट्टी धरणातील पाणीसाठा वाढल्यास आणि मागील बाजूस पाण्याचा फुगवटा (Backwater) निर्माण झाल्यास सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये अत्यंत भीषण महापुराची परिस्थिती निर्माण होते. कर्नाटकच्या मनमानीमुळे सांगली आणि कोल्हापूरच्या नागरिकांवर दरवर्षी महापुराची टांगती तलवार राहते.

सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज:

प्रभाकर केंगार यांनी नमूद केले की, कर्नाटकने लवादाचे नियम धाब्यावर बसवून हा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यावर आणि सुरक्षेवर गदा येत आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने मूळ याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले पाहिजे आणि कर्नाटकच्या बेकायदेशीर कामांना त्वरित स्थगिती मिळवली पाहिजे.

महाराष्ट्र सरकारने या विषयाकडे गांभीर्याने न पाहिल्यास भविष्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेती, उद्योग आणि जनजीवन या सर्वांवरच अत्यंत गंभीर आणि विपरीत परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *