मंत्रालयात एसीबीची धाड, 35 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, झिरवाळांच्या दालनात नेमकं काय घडलं?

महाराष्ट्रचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयाच्या इमारतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी मोठी कारवाई केली. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, एका परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यापैकी ३५ हजार रुपये गुरुवारी स्वीकारण्याचे ठरले होते. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर सापळा रचला. यानंतर त्यांनी राजेंद्र ढेरंग यांना पैसे स्वीकारताना ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर एसीबीने नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय सील केले आहे. या लाचेच्या व्यवहाराचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास सुरू केला आहे. अटक करण्यात आलेल्या लिपिकाने सुरुवातीच्या चौकशीत काही धक्कादायक नावे घेतल्याची चर्चा आहे. ज्यामुळे मंत्र्यांचे खासगी सचिवही संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे बोललं जात आहे.

या घटनेवर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा संबंध नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर या लाचखोरीच्या प्रकरणात माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले, तर मी तत्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन, असे नरहरी झिरवाळ यांनी सांगितले आहे.

इतिहासातील तिसरी मोठी कारवाई

दरम्यान मंत्रालयात मंत्र्यांच्या दालनात एसीबीने कारवाई करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात राजेंद्र दर्डा यांच्या कार्यालयावर अशी कारवाई झाली होती. त्यानंतर भाजपचे नेते एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यकावर लाचखोरीप्रकरणी कारवाई झाली होती. आता नरहरी झिरवाळ हे तिसरे मंत्री ठरले असून त्यांच्या कार्यालयात थेट एसीबीने धडक दिली आहे.

महायुती सरकारसाठी नामुष्की

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारमध्ये आधीच संवेदनशील स्थितीत आहेत. त्यातच थेट मंत्र्यांच्या दालनात झालेली ही कारवाई सरकारसाठी मोठी नामुष्की ठरली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *